Mumbai night temperature
मुंबई: जागतिक तापमानवाढ आणि वाढत्या शहरीकरणामुळे मुंबईत उन्हाळ्याचे दिवस आणि उष्ण रात्री या दोन्हीमध्ये वाढ झाली आहे. मात्र, दिवसाच्या तापमानापेक्षा रात्रीच्या तापमानात झालेली वाढ अत्यंत चिंताजनक आणि वेगवान आहे, असा निष्कर्ष 'काउन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर' (CEEW) या संस्थेने भारतीय हवामान खात्याच्या (IMD) आकडेवारीचे विश्लेषण करून काढला आहे.
रिपोर्टनुसार, १९८१ ते २०१० या काळात मुंबईत वर्षभरात सरासरी १२ 'अतिउष्ण रात्री' असायच्या. मात्र, २०११ ते २०२४ या काळात ही संख्या दुपटीहून अधिक वाढून २६ रात्री झाली आहे. याच काळात अतिउष्ण दिवसांची संख्याही १२ वरून १८ दिवसांवर पोहोचली आहे, पण रात्रीच्या तुलनेत हा वेग कमी आहे.
एखाद्या भागातील तापमान हे १९८१-२०१० दरम्यान नोंदवलेल्या ९० टक्के दिवसांच्या किंवा रात्रींच्या तापमानापेक्षा जास्त असते, तेव्हा त्याला 'अतिउष्ण दिवस किंवा रात्र' म्हटले जाते.
बदलत्या हवामानाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर आणि शहराच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम होत आहे. CEEW चे विश्लेषक विश्वास चितळे यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितले की, "रात्रीच्या वेळी वातावरण थंड न झाल्यामुळे लोकांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही. याचा फटका विशेषतः बाहेर कष्टाची कामे करणाऱ्या मजुरांना बसतो.
मुंबईसारख्या किनारपट्टीच्या शहरांमध्ये हवेतील आर्द्रता अधिक असते. घामाद्वारे शरीर थंड होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा येतो. उष्ण रात्रींमुळे दिवसाच्या प्रचंड उकाड्यानंतर शरीराला रिकव्हरीसाठी वेळ मिळत नाही. यामुळे हीट एक्झॉशन (उष्णतेचा त्रास) आणि उष्माघाताचा (Heat Stroke) धोका वाढतो, तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे आजार अधिक बळावतात, असेही विश्वास चितळे यांनी सांगितले.
कोळसा, तेल आणि गॅसच्या ज्वलनातून होणाऱ्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे जगभरात तापमान वाढत आहे. १९०१ पासून भारताचे सरासरी तापमान सुमारे ०.९ अंश सेल्सिअसने वाढले आहे. परंतु, शहरांमधील डांबरी रस्ते आणि काँक्रीटच्या इमारती दिवसा उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती वातावरणात सोडतात. याला 'अर्बन हीट आयलंड' (Urban Heat Island) परिणाम म्हणतात. यामुळे शहरांमधील तापमान अधिक वाढते. CEEW नुसार, भारतातील मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि जयपूरसारख्या पहिल्या व दुसऱ्या श्रेणीच्या (Tier 1 & Tier 2) दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये उष्ण रात्रींचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे.
'काउन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर' (CEEW)च्या विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे की, मुंबईत सर्वच ऋतूंमध्ये किमान तापमान वाढले असले, तरी ऑक्टोबर ते डिसेंबर या पावसाळ्यानंतरच्या महिन्यांत ही वाढ सर्वात जास्त होती. २०११-२०२४ दरम्यान उन्हाळ्यात सरासरी किमान तापमान सुमारे ०.५ अंश सेल्सिअसने वाढले (दिवसाच्या कमाल तापमानात ०.४ अंश सेल्सिअस वाढ झाली). तर पावसाळ्यानंतरचे महिने (ऑक्टोबर-डिसेंबर): दिवसाच्या कमाल तापमानात अवघी ०.१ अंश सेल्सिअस वाढ झाली असताना, रात्रीचे किमान तापमान मात्र ०.८ अंश सेल्सिअसने झपाट्याने वाढले आहे.
चितळे यांच्या मते, "जागतिक हवामान शास्त्रानुसार, थंड कालावधीत आणि थंड प्रदेशांमध्ये तापमानवाढ अधिक स्पष्टपणे जाणवते, हाच पॅटर्न आता भारतातही दिसत आहे." तसेच, पावसाळ्यानंतर हवेत राहणारी आर्द्रता रात्रीच्या वेळी बाहेर पडणारी उष्णता रोखून धरते, यामुळे वातावरण थंड होत नाही.हवामान शास्त्रज्ञ रघु मुर्तुगुड्डे यांनी स्पष्ट केले की, मान्सून उशिरा परतणे आणि नैऋत्येकडून येणारे वारे रेंगाळल्यामुळे ऑक्टोबरमध्ये आर्द्रता वाढते, ज्याचा थेट परिणाम रात्रीच्या तापमानावर होतो.
आयआयटी-गांधीनगरच्या २०१८ च्या एका अभ्यासातही असे दिसून आले होते की, १९७५ ते २०१५ दरम्यान भारतात उष्ण दिवस आणि रात्रींचे प्रमाण वाढले असून रात्रींचा वेग जास्त आहे. 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन सेटलमेंट्स'च्या हवामान संशोधक चांदनी सिंग यांच्या मते, भविष्यातील बहुतांश अंदाज हेच दर्शवतात की रात्री अधिक उष्ण होणार आहेत. CEEW च्या अंदाजानुसार, जागतिक तापमानवाढ अशीच मध्यम गतीने सुरू राहिली, २०३१-२०५० पर्यंत मुंबईतील अतिउष्ण रात्रींची संख्या आजच्या २६ वरून थेट ४८ ते ४९ रात्रींवर पोहोचू शकते. त्या तुलनेत दिवसाचे कडक उन्हाचे दिवस स्थिर राहतील.
विश्वास चितळे यांच्या मते, "उष्णतेचा धोका केवळ दिवसाच्या तापमानावर अवलंबून नसून उष्ण रात्री, हवेतील आर्द्रता, जमिनीचा बदलता वापर आणि स्थानिक सामाजिक-आर्थिक परिस्थिती यावरही अवलंबून असतो. या समस्येवर मात करण्यासाठी तज्ज्ञांनी तातडीच्या आणि दीर्घकालीन उपायांची शिफारस केली आहे.
बाहेर काम करणाऱ्या मजुरांसाठी अल्पकालीन संरक्षण उपाय लागू करणे.
शहरात झाडांचे प्रमाण आणि जलस्रोत वाढवणे, ज्याला 'ब्लू आणि ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर' म्हटले जाते.
अभ्यासातून असे समोर आले आहे की, मुंबईतील ज्या भागांमध्ये हिरवळ (झाडे) जास्त आहे, तेथील तापमान झाडे नसलेल्या भागांपेक्षा तब्बल १० अंश सेल्सिअसने कमी असते.
झोपडपट्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, जे एअर कंडिशनिंग खरेदी करू शकत नाहीत, अशा हरित जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत.