मुंबई : धुळवडीचा आनंद साजरा करताना रसायनयुक्त रंगांमुळे होळीचा बेरंग झाला. अनेकांना त्वचा व श्वसनासह अन्य समस्यांना सामोरे जावे लागले आहे. विविध महापालिका रुग्णालयांत दिवसभरात 37 जणांना उपचारासाठी दाखल करावे लागले. यापैकी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
होळीच्या पार्श्वभूमीवर शहरभर रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला; मात्र रसायनयुक्त रंगांचा वापर केल्याने अनेकांना त्वचेवर पुरळ, खाज, डोळ्यांची जळजळ तसेच श्वसनास त्रास होण्याच्या तक्रारी निर्माण झाल्या. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख महापालिका रुग्णालयांत रुग्णांची गर्दी झाली होती.
सायन रुग्णालयात सर्वाधिक 18 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून उर्वरित काहींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
केईएम रुग्णालय येथे 8 जणांना दाखल करण्यात आले असून सर्व रुग्ण ‘आपत्कालीन’ विभागात निरीक्षणाखाली आहेत. तसेच नायर रुग्णालय येथे 8 जणांवर उपचार सुरू आहेत. कूपर रुग्णालयात 3 जणांना दाखल करण्यात आले होते. सध्या कोणताही रुग्ण गंभीर अवस्थेत नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बहुतांश रुग्णांना रसायनयुक्त रंग त्वचेवर लागल्याने ॲलर्जी, पुरळ, सूज तसेच डोळ्यांची जळजळ व डोळ्यांना इजा अशा तक्रारी होत्या. काहींना रंगांचा वास किंवा रसायनांचा श्वासावाटे परिणाम झाल्याने श्वसनास त्रास जाणवला. दरवर्षी होळीच्या काळात अशा तक्रारींची नोंद होत असते. त्यामुळे नैसर्गिक रंगांचा वापर करावा, डोळ्यांचे संरक्षण करावे आणि रसायनयुक्त रंग टाळावेत, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
वडाळा ट्रक टर्मिनस परिसरात राहणारा तुषार सुनील उंजनवाल (18) याला होळी खेळल्यानंतर आयमॅक्सजवळ 8 ते 10 जणांनी एकाला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या डाव्या पायाच्या बोटांना तसेच हाताच्या मधल्या बोटांना दुखापत झाली होती. उजव्या बाजूच्या चेहऱ्यावर आघाताचे व्रण आढळले. त्याला लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे मृतावस्थेत आणण्यात आले, अशी माहिती रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.