पवई : मुंबईमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई उपनगरात असलेला पवई तलाव ओसंडून वाहू लागला. तलावाची ५४५ कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असून या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नाही. त्यामुळे हे पाणी औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते.
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला पवई तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तलावाची सध्याची पाण्याची पातळी १९५.१० फूट आहे. ५४५ कोटी लीटर पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या तलावातील पाणी पिण्यासाठी योग्य नाही. १८९० साली १२.५९ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेला तलावाचे पाणलोट क्षेत्र ६.६१ चौरस किलोमीटर आहे. जेव्हा तलाव पूर्णपणे भरतो तेव्हा पाण्याचे क्षेत्र सुमारे २.२३ चौरस किलोमीटर असते.
तलावाची पूर्ण प्रवाह पातळी १९५ फूट आहे. तलाव पूर्णपणे भरतो तेव्हा त्यात ५४५.५ कोटी लिटर पाणी असते. तलाव पूर्ण भरला की त्याचे पाणी मिठी नदीत वाहून जाते. गेल्या काही वर्षात हा तलाव भरल्यावर इथे पर्यटकांची गर्दी होते, परंतु यात काही जणांना जीव गमवावा लागल्याने इथल्या सुरक्षेबाबत चिंता ही व्यक्त केली जाते आहे.