मुंबई/ठाणे/पालघर : ठाणे, पालघरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे दोन्ही जिल्ह्यातल्या सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे. काळू, भातसा, वैतरणा, तानसा, सुर्या, पिंजाळ, उल्हास, बारवी, काळू, वालधुनी नदीला पूर आला आह. त्यामुळे रविवारी दुपारनंतर नदी किनारी सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. मुंबईत शनिवारपासून () मुसळधार नसली तरी पावसाची रिपरिप सुरू आहे.
उल्हास नदीवरील कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरचा रायते पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला तर बदलापुरातही उल्हास नदीने १६ मिटर ही पाणी पातळी गाठली. संततधार पावसामुळे काळू, भातसा, वैतरणा, तानसा, सुर्या, पिंजाळ, उल्हास, बारवी, काळू, वालधुनी नदीला पूर आला आह. त्यामुळे रविवारी दुपारनंतर नदी किनारी सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरवात झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
पालघर जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण आणि भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा म्हणजेच रेड अलर्ट देण्यात आला आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सर्व शाळा, महाविद्यालयांना सोमवार (२९ सप्टेंबर) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेश पालघरच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी दिले.
बारवी धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली. रविवारी धरण पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. सायंकाळी सहा वाजता धरणातून ३३० घन मीटर प्रति सेकंद पाणी विसर्ग सुरू होता. बारवी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे कल्याण तालुक्यात उल्हास नदीची पाणी पातळी आणखी वाढली. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, भातसा, वैतरणा हे तीनही धरणे सध्या काठोकाठ भरली असून एकूण साठा ९९.४० टक्के इतका झाला आहे. मागील २४ तासांत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची विक्रमी नोंद झाली असून यामुळे आगामी काळात मुंबईकरांना पाणी कपातीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भातसा धरणाची एकूण पाणीपातळी १४२ मीटर इतकी असून यामध्ये आतापर्यंत ९९.३६ टक्के इतका पाणीसाठा आहे.
दरम्यान भातासा धरणाचे दरवाजे ४ मिटरने उघडले असून यामधून ६६ हजार पेक्षा जास्त क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तथापि नदी काठी असलेल्या अनेक गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात शहापूर तालुक्यात परतीचा पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.