मुंबई: दीड दिवसापासून म्हणजे १५ सप्टेंबरपासून बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यामुळे अरबी समुद्राला असलेली भरती व ओहटी बघूनच गणेश मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सव मंडळांना केले आहे.
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये मोठ्या गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात येते. समुद्राला येणाऱ्या भरतीच्या वेळा माहीत नसल्यामुळे विसर्जन करताना बुडण्याची भीती जास्त असते. त्यामुळे विसर्जनासाठी भरती व ओहोटीच्या वेळा प्रत्येक गणेशभक्तांना माहीत असणे आवश्यक आहे.
ओहोटीच्या वेळी लहान गणेश मूर्तीचे विसर्जन करणे सोयीचे असते. मात्र मोठ्या गणेश मूर्तीचे विसर्जन समुद्राला भरती असताना करणे आवश्यक आहे. पण समुद्राला मोठे उधाण असताना गणेश विसर्जन करणे धोक्याचे असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
यंदा १५ सप्टेंबरला दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन आहे. या दिवशी दुपारी २.१० वाजता मोठी भरती असणार आहे. यावेळी गौरी गणपती विसर्जन १९ सप्टेंबरला आहे. या दिवशी समुद्राला सायंकाळी ४.२८ वाजता भरती आहे. शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०३ व रात्री ११.२७ वाजता समुद्राला मोठी भरती आहे. त्यामुळे विसर्जन करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.