मुंबई : प्रशासकीय राजमध्ये बंद असलेल्या नालेसफाईच्या सहली तब्बल चार वर्षानंतर पुन्हा सुरू झाल्या आहेत. सध्या महापौर व उपमहापौर यांच्यामार्फत स्वतंत्रपणे नाले सफाईची पाहणी करण्यात येत असून लवकरच स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेते, विरोधी पक्ष नेत्यांच्या नाल्याच्या सहलीही आयोजित करण्यात येणार आहेत.
मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी नालेसफाईचे कामे दरवर्षी केली जातात. यावर करोडो रुपये खर्च केले जातात. पण पाणी तुंबायचे तेवढे तुंबते. नालेसफाईचे काम योग्य पद्धतीने चालले आहे की नाही, याची खातरजमा करण्याकरता महापौरांसह उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष व विरोधी पक्ष नेत्यांचे नालेसफाई दौरे होतात. त्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी पाहायला मिळतात. नालेसफाईवरून सभागृहात तासनतास चर्चा होते. महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे गेल्या चार वर्षापासून हे दौरे पूर्णपणे बंद होते.
मात्र यंदापासून पुन्हा हे दौरे सुरू झाले आहेत. महापौर रितू तावडे व उपमहापौर संजय घाडी वैयक्तिकरित्या नाले सफाईच्या पाहणीला फिरत आहेत.महापौर रितू तावडे यांनी दोनच दिवसांपूर्वी नालेसफाईची पाहणी केली. यावेळी नाल्यांतील गाळ काढण्याच्या कामांना तातडीने गती देऊन ती सर्व कामे 31 मे पर्यंत पूर्ण करावीत.
आवश्यक त्या ठिकाणी नाल्यांना संरक्षक भिंत उभारून सुरक्षितता आणि दीर्घकालीन उपाययोजना सुनिश्चित करण्याचे निर्देश यावेळी महापौर यांनी दिले. महापौरांनी केलेल्या या दौऱ्यानंतर अवघ्या दोनच दिवसात म्हणजे गुरुवार 7 मे,ला उपमहापौर संजय घाडी यांनी सफेद पूल नाला, 90 फुटी रस्ता कलव्हर्ट, साकीनाका मेट्रो स्थानक, कुर्ला (पश्चिम), मिठी नदी, क्रांती नगर, बैल बाजार आधी भागातील नाल्यांना भेटी देऊन, कामाचा आढावा घेतला.
पालकमंत्र्यांचेही लवकरच दौरे...
मुंबईतील नालेसफाईचे शहर उपनगरातील पालकमंत्रीही दौरे करणार असल्याचे समजते. यात शहराचे पालकमंत्री स्वतः व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार स्वतंत्रपणे नालेसफाईची पाहणी करणार आहे. या दौऱ्यांसाठी स्वतः महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनाही उपस्थित रहावे लागणार आहे.
पूर्वनियोजित दौऱ्यामुळे अधिकारी सावध
महापौर व उपमहापौर तसेच पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी अचानक जाऊन नालेसफाईचा दौरा करणे अपेक्षित आहे. अशा दौऱ्यांमध्ये नेमकी नालेसफाईचे काम होते की नाही, हे दिसून येईल. पण महापौर व उपमहापौरांच्या दौऱ्याची माहिती आदल्या दिवशीच निश्चित होत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी अधिकारी महापौर व उपमहापौराना जेथे घेऊन जाणार त्या भागात सर्व यंत्रणा अगोदरच सज्ज ठेवण्यात आलेली असते. करणारे सफाईचे कामही युद्धपातळीवर सुरू असते. त्यामुळे नालेसफाई दौऱ्याचा फारसा फायदा होत नसल्याचे दिसून आले आहे.