Mumbai Dahi Handi Govinda Injured
मुंबई : दहीहंडीच्या थरावर थर रचत गोविंदा पथकांचा जल्लोष सुरू असतानाच या थराराला दुखापतींची किनार लागली आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाची तमा न बाळगता हंडी फोडण्यासाठी उंच मानवी मनोरे रचताना मुंबईत दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल ३२ गोविंदा जखमी झाले. यापैकी २८ जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
मुंबईत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असतानाही गोविंदा पथकांचा उत्साह कायम होता. सकाळी १० वाजल्यापासून शहरातील विविध भागांत दहीहंडी फोडण्यास सुरुवात झाली. थरावर थर रचताना तोल जाऊन पडल्याने अनेक गोविंदांना दुखापत झाली. त्यानंतर दुपारपासून जखमी गोविंदांचे रुग्णालयात येणे सुरू झाले.
जखमी गोविंदांवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी महापालिका रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सकाळपासूनच सतर्क ठेवण्यात आली असून, विविध रुग्णालयांमध्ये सुमारे १२५ खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
पावसामुळे रस्ते आणि परिसर निसरडा झालेला असतानाही गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्याची चुरस कायम आहे. त्यामुळे पुढील काही तासांत जखमी गोविंदांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून, महापालिका आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.