पुढारी ऑनलाईन डेस्क: राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आज (दि.१८) आणखी पाच जणांना अटक केली. नवी मुंबईतील पनवेल आणि कर्जत येथून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त 'PTI' ने दिले आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईतील वांद्रे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. मुंबईतील वांद्रे येथील त्यांचा मुलगा आमदार जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी उशिरा बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्याच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी चार गोळ्या त्याला लागल्या. त्यांना घटनास्थळावरून लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बाबा सिद्दिकीच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचं बोललं जात आहे. सलमान खानला धमकी देण्यासाठी त्याने सिद्दिकीची हत्या केल्याचे मानले जात आहे.
शुक्रवारी मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात अभिनेता सलमान खानसाठी धमकीचा संदेशही आला होता. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा जवळचा असल्याचे सांगितले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर हा मेसेज आल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये सलमान खानचे लॉरेन्स बिश्नोईसोबतचे दीर्घकाळचे वैर संपवण्यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. संदेश पाठवणाऱ्याने दावा केला आहे की, तो सलमान आणि लॉरेन्स टोळीमध्ये समेट घडवून आणेल. यासाठी त्याने पैसे मागितले असून पैसे न दिल्यास सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, असे म्हटले आहे.
मुंबई ट्रॅफिक पोलिसांना अभिनेता सलमान खानच्या नावाने जीवे मारण्याचा धमकीचा मेसेज आल्यानंतर त्याच्या घरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर हायटेक शस्त्रे असलेले सुमारे 30 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.