BMC Election 2025  Pudhari Photo
मुंबई

मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा ? ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने बदलली राजकीय समीकरणे

BMC Election 2025 | निवडणुकीपूर्वी स्वतंत्रपणे लढू, निकालानंतर गरज पडल्यास आघाडी; काँग्रेसचा विचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Congress News

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्ष एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीचा घटक म्हणून लढण्याऐवजी स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने चाचपणी सुरू केली आहे.

...म्हणून स्वतंत्र लढल्यास फायदाच

राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही नवी रणनीती आखली असून, स्वतंत्र लढल्यास पक्षाला अधिक फायदा होईल, असा विश्वास मुंबईतील काँग्रेस नेत्यांना वाटत आहे.

आघाडीत लढल्यास नुकसानीची भीती

काँग्रेसच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या मते, महाविकास आघाडीत निवडणूक लढल्यास जागावाटपात पक्षाला मोठा फटका बसू शकतो. मुंबईतील उत्तर भारतीय, दलित आणि मुस्लीम मतदार हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जातो. आघाडी झाल्यास या भागातील जागा मित्रपक्षांना सोडाव्या लागतील, ज्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

राज-उद्धव फॅक्टर महत्त्वाचा

दुसरीकडे, जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर राज यांच्या भूमिकेवर नाराज असलेला मतदार वर्ग महाविकास आघाडीला मतदान करणार नाही, असे काँग्रेसचे गणित आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढल्यास हा नाराज मतदार आपल्याकडे वळवता येईल, असा पक्षाचा अंदाज आहे.

गरज पडल्यास आघाडी ; काँग्रेसचा विचार सुरू

या सर्व शक्यता लक्षात घेता, काँग्रेसने निवडणुकीपूर्वी स्वतंत्रपणे लढून आपली ताकद आजमावण्याचा आणि निकालानंतर गरज पडल्यास आघाडी करण्याचा विचार सुरू केला आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT