Mumbai BMC schools pudhari photo
मुंबई

Mumbai BMC schools : पालिका शाळेत २४ कोटींच्या पुस्तिका खरेदी प्रस्तावावर विरोधक आक्रमक

पुस्तिकांचा ४५ दिवसांत पुरवठा कसा होणार? असा सवाल करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल सादर करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय व व्याकरण पुस्तिका खरेदी करण्यासाठी २४ कोटी रुपयांच्या प्रस्तावावर स्थायी समितीच्या सभेत विरोधक आक्रमक झाले होते. या सर्व पुस्तिकांचा ४५ दिवसांत पुरवठा कसा होणार? असा सवाल करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल सादर करण्याची मागणी केली.

यावेळी सभागृहात काॅग्रेस पक्षाचे गटनेते अशरफ आजमी यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यास विरोध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, मागील दोन वर्षांपासून पुस्तिका दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत किती सुधारणा झाली, याचा कोणता अभ्यास करण्यात आला आहे? असा सवाल उपस्थित केला.

सप्टेंबरमध्ये प्रस्ताव मंजूर करून ४५ दिवसांत पुरवठा केल्यास पुस्तिका उशिरा मिळतील आणि शैक्षणिक वर्षाचा मोठा कालावधी संपल्यानंतर त्याचा विद्यार्थ्यांना किती फायदा होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आता काँग्रेस पक्ष महापालिकेच्या शाळांच्या इमारतींची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सहिदा खान यांनी कंत्राटदार किंवा वितरकांच्या माध्यमातून पुस्तिका खरेदी करण्याऐवजी थेट प्रकाशन संस्थांकडून खरेदी करण्याची सूचना केली. त्यामुळे महापालिकेचा मोठा खर्च वाचू शकतो, असे सांगितले. यापूर्वी किती पुस्तिका खरेदी करण्यात आल्या आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर किती झाला, याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली.

विविध भाषांतील पुस्तिकांच्या नियोजनात मराठी माध्यमाकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.तर मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी २०२६-२७ साठीच्या खरेदीचे नियोजन सप्टेंबर २०२५ मधील विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात येत असल्याबाबत आक्षेप घेतला. चालू वर्षात विद्यार्थी संख्या वाढल्यास अतिरिक्त विद्यार्थ्यांचे काय, असा सवाल त्यांनी केला. सुमारे २४ कोटी रुपयांचे काम, छपाई, बाइंडिंग, गुणवत्ता तपासणी आणि शाळानिहाय वितरण अवघ्या ४५ दिवसांत कसे पूर्ण होणार, याचे स्पष्टीकरण मागितले.

खर्चात पारदर्शकता आवश्यक : जमीर कुरेशी

जमीर कुरेशी यांनी पुस्तिकांच्या किंमती, खरेदी प्रक्रिया आणि निविदेतील अटींबाबत माहिती मागत खर्चात पारदर्शकता आवश्यक असल्याचे मत मांडले. प्रशासनाने मात्र ३० सप्टेंबर ही विद्यार्थी संख्या निश्चित करण्याची अधिकृत तारीख असल्याचे सांगत उपलब्ध आकडेवारीच्या आधारे नियोजन करावे लागते, असे स्पष्ट केले. मागील दोन वर्षांत या योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या निकालात सुधारणा झाल्याचा दावा प्रशासनाने केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT