मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे पुढे ढकललेला मुंबई महापालिकेचा 2026-27 चा अर्थसंकल्प बुधवार 25 फेब्रुवारीला स्थायी समिती अध्यक्षांकडे सादर करण्यात येणार आहे. 2025-26 अर्थसंकल्पीय अंदाज पत्रापेक्षा यावेळी अर्थसंकल्पाचे आकारमान 10 ते 12 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
2025-26 मध्ये 74 हजार 427 कोटी 41 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता, जो 2024-25 च्या अर्थसंकल्पापेक्षा 14.19 टक्क्यांनी जास्त होता. यावेळी अर्थसंकल्पात अजून वाढ होणार असल्यामुळे अर्थसंकल्पाचे आकारमान सरासरी 80 हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी 4 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्यात येतो. मात्र मुंबई महापालिका निवडणूक झाल्यामुळे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्वतः अर्थसंकल्प सादर न करता स्थायी समितीत अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला. परंतु स्थायी समिती अस्तित्वात नसल्यामुळे 4 फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प पुढे ढकलण्यात आला. आता स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक 20 फेब्रुवारीला होणार असल्यामुळे समिती अस्तित्वात येणार असल्याने पालिका प्रशासनाने बुधवार 25 फेब्रुवारीला होणाऱ्या स्थायी समितीच्या पहिल्या साप्ताहिक बैठकीत अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी दुपारी एक वाजता अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून त्यानंतर स्थायी समितीत अर्थसंकल्पावर चर्चा करून तो महापालिकेच्या अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
यावेळी अर्थसंकल्पात जुन्याच कामांना प्राधान्य देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यात सागरी किनारा रस्ता प्रकल्प दक्षिण उत्तर वर्सोवा ते दहिसर यासाठी सर्वाधिक एकूण भांडवली कामांसाठी तरतूद करण्यात येणाऱ्या निधीपैकी 13 टक्क्यांपर्यंत आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पाणीपुरवठा, रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या व अन्य चालू प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात मागील वर्षापेक्षा जास्त तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई शहर व उपनगरांत मुंबई महापालिकेच्या वतीने तब्बल 2 लाख 32 हजार 412 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी येणाऱ्या आर्थिक वर्षात सुमारे 40 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचे समजते. सुरू असलेल्या कामांमध्ये उड्डाणपूल, रस्ते, पाणीपुरवठा प्रकल्प, रुग्णालयांचा विकास आदींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.