मुंबई : मुंबईत शुक्रवारी (दि.१८) पहाटे मोठी दुर्घटना झाली. वांद्रे पूर्व येथील भारत नगर परिसरात एक तीन मजली चाळ कोसळली. या घटनेत अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत नगर येथील चाळ क्रमांक ३७ चा दुसरा आणि तिसरा मजला आज पहाटे पावणेसहाच्या सुमारास अचानक कोसळला. गाढ झोपेत असतानाच ही दुर्घटना घडल्याने अनेक रहिवासी आत अडकले. ढिगाऱ्याखालून लोकांच्या किंचाळण्याचे आवाज येत असल्याने परिसरात खळबळ उडाली. अंदाजे ८ ते १० नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेला 'लेव्हल-२'चा कॉल घोषित करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांसह मुंबई पोलीस, म्हाडा, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), बीएमसीचे वॉर्ड कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिकांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.
आतापर्यंत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव मोहिमेत 2 ADFO, 5 वरिष्ठ फायर ऑफिसर (SrSO), 1 स्टेशन ऑफिसर (SO), 5 फायर इंजिन, 1 मोबाइल वर्कशॉप टीम (MWT), 1 कमांड आणि कंट्रोल फायर युनिट (CFF), 1 फोर्स टेंडर (FT), 1 रेस्क्यू व्हेइकल (RV), आणि 1 वॉटर क्विक रिस्पॉन्स व्हेइकल (WQRV) तैनात करण्यात आले आहेत. बचाव पथकाने ७ जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे मुंबईतील धोकादायक आणि जुन्या चाळींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.