मुंबई : मुंबई विमानतळावर मंगळवारी (दि.३) एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सच्या विमानांचे पंखे एकमेकांना घासल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही विमानांचा वेग कमी असल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. दोन्ही विमानातील प्रवासी सुखरूप असून या दुर्घटनेमध्ये दोन्ही विमानांचे किरकोळ नुकसान झाले.
देशातील हवाई वाहतुकीसाठी सर्वात व्यस्त असलेल्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकले. एअर इंडियाचे (AI2732) हे विमान मंगळवारी (दि.३) उड्डाणासाठी रनवेकडे जात होते. त्याच वेळी इंडिगोच्या हैदराबादहून मुंबईला येणाऱ्या फ्लाइट 6E 791 च्या विमानाचे लँडिंग झाले. हे विमान टॅक्सी वे 'B1' ला जोडण्यासाठी टॅक्सिंइंग करत होतं. त्यावेळी दोन्ही विमानांच्या उजव्या पंखांची टोकं एकमेकांना घासली. दोन्ही विमाने रनवेकडे धीम्या गतीने जात होती. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेनंतर दोन्ही विमाने थांबवण्यात आली. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर दोन्ही विमाने दुरुस्तीसाठी रवाना करण्यात आली. या प्रकरणी डीजीसीएने चौकशी केली असून दोन्ही विमान कंपन्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. अपघातग्रस्त विमानाची तपासणी सुरू असून या घटनेची चौकशी केली जात आहे, असे इंडिगो एअरलाईन्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे.