मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १चे बांधकाम सुरक्षित न राहिल्याच्या कारणास्तव हे टर्मिनल ऑक्टोबर २०२५ मध्ये पाडण्याचे आदेश विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने दिले आहेत, तर सप्टेंबर २०२८ पर्यंत या टर्मिनलची पुनर्बाधणी केली जाणार आहे.
आयआयटी मुंबईमार्फत टर्मिनल १ चे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले. यावेळी टर्मिनलच्या बांधकामाला काही ठिकाणी तडे गेल्याचे आढळून आले, तर काही ठिकाणी गळती व गंज दिसून आला. सुरक्षेच्या कारणास्तव हे टर्मिनल बंद करून ऑक्टोबर २०२५मध्ये पाडले जाणार आहे. सध्या या टर्मिनलमधून १ कोटी ५० लाख प्रवासी प्रवास करतात. नव्याने उभारण्यात येणाऱ्या टर्मिनलमध्ये २ कोटी प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असेल.
मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून युजर डेव्हलपमेंट फी आकारली जाते. हे शुल्क स्थानिक प्रवासासाठी ३२५ आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ६५० रुपये आहे. दुसऱ्या बाजूला पार्किंग शुल्क ३५ टक्क्यांनी कमी करून प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे. सुरुवातीला ५ वर्षांसाठी १० हजार कोटींची गुंतवणूक नव्या टर्मिनलमध्ये केली जाणार आहे. तसेच यील्ड पर पेसेंजर हे शुल्क १८ टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. हे शुल्क सध्या २८५ रुपये असून ते ३३२ रुपये केले जाईल.