मुंबई : मुंबईतील हवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण व हवामान बदल विभाग तसेच प्रशासकीय विभागनिहाय (वॉर्ड) यांनी फेब्रुवारी २०२६ या महिन्यात व्यापक आणि कठोर कारवाई केली. दिनांक २ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबई महानगरातील विविध प्रभागांमध्ये एकूण १,०८२ ठिकाणी तपासणी करण्यात आली. यापैकी १३५ बांधकामांना ‘कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच ९३ बांधकामांना काम थांबविण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
रस्त्यांची सखोल स्वच्छता :-
हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने सार्वजनिक रस्ते आणि इतर ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबवली आहे. पाण्याच्या टँकरद्वारे १,४५४.०९ किलोमीटर अंतराएवढ्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. तसेच ६८४.८ किलोमीटर अंतरावरील रस्त्यांवर मिस्टिंग मशिन्सचा वापर करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केवळ दंडात्मक नव्हे तर प्रतिबंधात्मक आणि सुधारात्मक उपाययोजनाही राबवल्या जात आहेत. हवेची गुणवत्ता आरोग्यदायी ठेवणे आणि पर्यावरण संवर्धन साधणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे.