मुंबई : अल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडणार असून, त्यातच प्रचंड उष्णतेच्या लाटेत मुंबईच्या सर्व धरणांतील जलपातळी बाष्पीभवनामुळे झपाट्याने कमी होत आहे. सध्याचा 33.60 टक्के पाणीसाठा किमान तीन महिने पुरवता यावा म्हणून येत्या 1 मे पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय पालिकेच्या जल अभियंता विभागाने घेतला आहे.
या पाणीकपातीचा प्रस्ताव पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना सादर करण्यात आला आहे. त्यावर आयुक्त जल अभियंता विभागांच्या अभियंत्यांची बैठक घेतील आणि पाणीकपातीवर शिक्कामोर्तब होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सध्याचा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरवण्यासाठी पाणीकपात करणे आवश्यक असल्याचे जल अभियंता विभागातील अभियंत्यांचे म्हणणे आहे. 1 मे पासून 10 टक्के पाणीकपात केल्यास महिनाभरात सुमारे 12 हजार दशलक्ष लिटर पाण्याची बचत होईल. पाणीटंचाई टाळण्यासाठीच ही काटकसर आतापासून करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले.
संपूर्ण शहरात दहा टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर शहराला पुरवठा होणाऱ्या पाण्यामध्ये दररोज सुमारे 400 दशलक्ष लिटर पाण्याची कपात केली जाईल.
सध्या शहराला दररोज 3,950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो, त्याऐवजी 3,550 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होईल.
धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर) 15 एप्रिल 2026 पर्यंतचा
अप्पर वैतरणा - 77,045
मोडक सागर - 45,340
तानसा - 40, 817
मध्य वैतरणा - 69,106
भातसा - 2,35,439
विहार - 15,353
तुळशी - 3,274