मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसगाड्यांचा ताफा अद्ययावत करण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच ८३०० नव्या बसेसची भर पडणार आहे.
त्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळेल, असा विश्वास महामंडळाच्या सूत्रांनी व्यक्त केला. या नव्या गाड्यांमध्ये साध्या, स्मार्ट, व्होल्व्हो (आसनी आणि शयनयान) मिनी बस असा सर्वच श्रेणींतील गाड्यांचा समावेश आहे. डिसेंबर २०२६ अखेर या बसेस सेवेमध्ये आणण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. सध्या महामंडळाकडे बसेसचा पुरेसा ताफा नाही. त्यामुळे आयुर्मान संपलेल्या किंव नादुरुस्त गाड्या तात्पुरत्या दुरुस्त करून चालवण्याची नामुष्की महामंडळावर आली आहे. दिवाळीतील सणासुदीच्या हंगामात एसटीच्या नादुरुस्त आणि वारंवार बंद पडणाऱ्या गाड्या हा चर्चेचा विषय बनला होता. अनेक ठिकाणी या गाड्या विलंबाने पोहोचत असल्यामुळे प्रवाशांना मनःस्ताप सोसावा लागतो.
एकदा या ८३०० गाड्या महामंडळाच्या सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच यामुळे एसटीच्या जुन्या आणि नादुरुस्त गाड्यांची समस्या दूर होणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले असून त्याचा अंगीकार एसटी महामंडळाने केला आहे. त्यामुळे दरवर्षी एसटी महामंडळाने दरवर्षी किमान एक हजार स्मार्ट ई-बसेस खरेदी करण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे या सर्व बसेस एसटी महामंडळाच्या स्वमालकीच्या असणार आहेत.
ई-बसेसमध्ये असणार एआय आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली
पुण्यातील एका कंपनीने उत्तर प्रदेश परिवाहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई-बसचे सादरीकरण नुकतेच परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासमोर केले होते. या ई-बस 'एआय' तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवलेल्या असणार आहेत. स्वारगेट येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बाहेरील व्यक्ती बसमध्ये सहजपणे प्रवेश करू शकणार नाहीत, अशी यंत्रणा या बसमध्ये असावी, यावर भर देण्यात आला आहे. आग किंवा इतर घटना घडल्यास तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा बसमध्ये असणे आवश्यक आहे, अशा सूचनाही बस तयार करणाऱ्या कंपनीला देण्यात आल्या आहेत.