मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करत फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकन ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल मूल्यमापन प्रणालीद्वारे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रणाली हिवाळी 2025 परीक्षा सत्रापासून लागू करण्यात आली आहे.
तंत्रनिकेतनमधील पदविका शिक्षण घेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा निकालानंतर फोटोकॉपी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी स्वतंत्र अर्ज किंवा कागदोपत्री प्रक्रिया करावी लागणार नाही. विद्यार्थी थेट स्टुडन्ट लॉग-इनच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना आपला एनरोलमेंट नंबर आणि सीट नंबर वापरून लॉग-इन करावे लागणार असून, ओटीपीद्वारे प्रमाणीकरण करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
डिजिटल प्रणालीत लॉग-इन केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या डॅशबोर्डवर उपस्थित विषय, प्राप्त गुण तसेच फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनची स्थिती स्पष्टपणे दिसणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना एका सीट नंबरसाठी कमाल दोन विषयांपर्यंतच फोटोकॉपी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर त्याची पावती त्वरित डाउनलोड करता येणार असून, ही पावती भविष्यातील सर्व संदर्भांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.
फोटोकॉपीसाठी अर्ज केल्यानंतर संबंधित उत्तरपत्रिकेची छायाप्रत विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात किंवा मंडळाच्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. मात्र, यासाठी विद्यार्थ्यांनी आपला ई-मेल आयडी प्रोफाइलमध्ये अचूक नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. अर्जांची विषयवार यादी महाविद्यालयांच्या लॉग-इनमध्ये उपलब्ध होणार आहे. पुनर्मूल्यांकनाच्या बाबतीतही प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यात आली आहे.
पुनर्मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मूल्यमापनापूर्वीचे गुण, पुनर्मूल्यांकनानंतरचे गुण तसेच ‘गुणांत बदल झाला’ किंवा ‘बदल नाही’ अशी स्पष्ट नोंद पाहता येणार आहे. काही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची पीडीएफ प्रतही डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अपूर्ण अर्ज, चुकीची माहिती किंवा वेळेत शुल्क न भरल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. तसेच पुनर्मूल्यांकनाचा निकाल अंतिम राहील व त्याविरोधात पुढील कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
डिजिटल मूल्यमापन प्रणालीमुळे मूल्यांकनातील मानवी हस्तक्षेप कमी होणार, विद्यार्थ्यांचा विश्वास वाढणार आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. विशेषतः ग्रामीण व दूरवरच्या भागातील विद्यार्थ्यांसाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मंडळाने नमूद केले आहे. यासंदर्भातील वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.