मुंबई: पावसाची गेल्या काही दिवसापासून चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या मुंबईकरांची प्रतीक्षा आता संपली आहे. पावसाचे मुंबईत धडाकेबाज आगमन झाले आहे. मंगळवारी सकाळी ८ ते ९ या तासाभरात शहर व पश्चिम उपनगरात २० ते ३२ मिमी पावसाची नोंद झाली.
जून महिना संपत आला तरी मुंबई शहरात पावसाचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे मुंबईकर उकाड्याने अक्षरशः त्रस्त झाले होते. तर दुसरीकडे पाणीटंचाईमुळे चिंतेमध्ये अजूनच भर पडली आहे. अखेर मंगळवारी सकाळी शहर व पश्चिम उपनगरात पावसाचे आगमन झाले. त्यामुळे मुंबईकर सुखावला आहे. पावसामुळे रेल्वे व रस्त्यावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही.
तलाव क्षेत्रात किरकोळ पाऊस
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रातही किरकोळ पाऊस झाला. गेल्या २४ तासात मध्य वैतरणा परिसरात ५५ मिमी पावसाची नोंद झाली. भातसा १६ मिमी व मोडकसागर १३ मिमी पावसाची नोंद झाली.
अशी झाली पावसाची नोंद
परळ - २९ मिमी
प्रभादेवी -२५ मिमी
वरळी - २३ मिमी
मलबार हिल- - २२
दादर अग्निशमन केंद्र - २० मिमी
पश्चिम उपनगर
मालवणी - ३२ मिमी
मालाड - २७ मिमी
वांद्रे - २३ मिमी
पाली चिंबई - २० मिमी
पूर्व उपनगर - तुरळक पाऊस