Mohan Bhagwat  
मुंबई

Mohan Bhagwat | 'पंचपरिवर्तन'साठी संघ स्वयंसेवकांचे काम सुरु : सरसंघसंचालक मोहन भागवत

मुंबई येथे आयोजित व्याख्यानात मांडले मत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वदेशी तथा स्वबोध आणि नियम, कायद्यांचे पालन या पाच आघाड्यांवर काम करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. या 'पंचपरिवर्तन' साठी संघ स्वयंसेवकांचे काम सुरू झाले असून सर्व समाजाने यात सहभागी व्हायला हवे असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मुंबई येथे आयोजित एका व्याख्यानात ते बोलत होते.

पंचपरिवर्तनात 'संविधान' या आयामांवर विशेष भाष्य करताना मोहन भागवत म्हणाले की, वसुधैव कुटुंबकम हे हिंदू मानस आहे. सर्वांचा स्वीकार आणि सर्वांचा सन्मान, या भारतीय स्वभावानुसारच भारतीय संविधानाची निर्मीती झाली आहे. आपले भारतीय संविधान हे एका अर्थाने धर्माच्या आचरणाचे युगानुकुल रूप आहे. असेही ते म्हणाले.

देशाची फाळणी धर्माच्या आधारावर!

देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. पुढे पाकिस्तान आणि बांग्लादेश हे मुस्लिम राष्ट्र बनले. आपस मात्र सर्वांचा स्वीकार या तत्वाचे अभिसरण केले. ही आपली चूक होती, असे मानणाराही एक वर्ग समाजात आहे. मात्र, सर्वांचा स्वीकार, वसुधैव कुटुंबकम या हिंदू स्वभावाच संविधानात प्रतिबिंबित झाला आहे.

कुटुंबात करा संविधानाचे वाचन!

त्यामुळे या संविधानाची प्रस्तावना, मार्गदर्शक तत्वे, नागरी कर्तव्ये आणि अधिकार या चार महत्वाच्या अंगांबाबत वाचन आणि चर्चा कुटुंबांमध्ये व्हायला हवी. तसेच, या आधारावर जे नियम आणि कायदे बनले आहेत त्यांचे पालन करण्याची शिस्त समाजाच्या अंगी निर्माण करण्याची गरज आहे. अशी भावनाही डॉ. मोहन भागवत यांनी बोलून दाखवली.

मंदिर, स्मशानात सर्वांना प्रवेश हवा!

पुढे बोलताना सरसंघसंचालक म्हणाले की पंचपरिवर्तनातील या आयामात एक रूपयाही खर्च न करता प्रत्येकजण ही कामे करू शकतो. सामाजिक समरसतेत जातीपाती मनात ठेवू नका, बंधूता आणि समानतेचा व्यवहार असायलाच हवा. संवादाच्या माध्यमातून मंदिर, पाणी, स्मशान यात सर्व हिंदूंना प्रवेश द्यायला हवा. संघर्ष किंवा लादून या बाबी केल्यास त्याचा नेमका उलटा परिणाम संभवतो. तर, कुटुंब प्रबोधनासाठी कुटुंबातील संवादावर संघाने भर दिला आहे. या संवादाच्या अभावी अंमली पदार्थांचे व्यसन अथवा गेमिंगचे बळी पडतात. तर, पर्यावरण रक्षण संवर्धनासाठी वैयक्तिक पातळीवर करता येईल अशा कामाने सुरूवात करायला हवा. एकल प्लास्टीकचा वापर टाळण्यापासून घरात, सोसायटीत हरित आच्छादन वाढवायला हवे असे मतही मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

ते सगळेच स्वयं सेवक

राष्ट्रकार्यासाठी संघ कार्यरत आहे. तसेच अनेक लोक अनेक क्षेत्रात प्रयत्नशील आहेत. निस्वार्थबुद्धीने समाजासाठी, राष्ट्रासाठी कामे करणारे सगळे हे स्वयंसेवकच आहेत, अशी संघाची भावना आहे. संघाच्या कामात किंवा पंचपरिवर्तनाच्या प्रयत्नात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही मोहन भागवत यांनी केले. संघाला जाणून घ्यायचे असेल तर 'प्रपोगंडा आणि परसेप्शन'चे बळी न पडता मुळातून संघ समजून घ्या. संघाचे स्वयंसेवक, संघ स्वयंसेवकांचे घर, संघाच्या शाखा आणि संघाच्या कार्यक्रमातून संघाची अनुभूती घ्या आणि आपले मत बनवा असे आवाहनही मोहन भागवत यांनी केले. तर, वस्तुस्थिती किंवा तथ्यांवर आधारित केलेली टीकेचे आम्ही स्वागत करतो. त्यातून आम्हाला आमच्यात सुधारणा घडविण्यात मदतच होते असेही भागवत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT