Raj Thackeray Birthday Tree Plantation Appeal: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या 14 जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि समर्थकांना एक विशेष आवाहन केले आहे. दरवर्षी वाढदिवसानिमित्त राज्यभर होर्डिंग्ज, बॅनर, पुष्पगुच्छ आणि विविध कार्यक्रमांद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला जातो. मात्र यंदा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त राज्यभर फुलझाडे, फळझाडे आणि टिकाऊ वृक्ष लावण्याचे आवाहन केले आहे. केवळ झाडे लावून फोटो काढण्यापेक्षा ती दीर्घकाळ जिवंत राहतील याची जबाबदारीही घ्यावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. झाडे लावताना स्थानिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे आणि त्यांची देखभाल करण्यासाठी त्यांनाही प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
यासोबतच उन्हाळ्यात पाण्याअभावी भटकणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाणवठे उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. जंगलांच्या परिसरात तसेच शहरांमध्ये भटक्या प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी आणि ती नियमित भरलेली राहतील याची काळजी घ्यावी, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात हवामान बदल आणि वाढत्या वृक्षतोडीबाबतही चिंता व्यक्त केली आहे. यंदाचा उन्हाळा अत्यंत तीव्र होता आणि पुढील काळात पावसाचे प्रमाणही कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असून झाडांची जंगलं नष्ट करून काँक्रीटची जंगलं उभी केली जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. भविष्यात मुलांना प्राणीसंग्रहालयात जाऊन प्राणी दाखवावेत तसे झाडे दाखवण्यासाठी वेगळ्या ठिकाणी घेऊन जावे लागू नये, यासाठी आजच झाडे लावून ती जपण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यंदा 14 जून रोजी आपण मुंबईत नसल्याने कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष भेट होणार नसल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी महाराष्ट्र सैनिक आणि समर्थकांना केले आहे.