मुंबईत पुन्हा एकदा भाषा वादावरून राजकीय वातावरण तापलंय! निमित्त ठरलंय मुंबईचा अतिशय उच्चभ्रू परिसर असलेल्या मलबार हिलमधील ते वादग्रस्त बोर्ड. मलबार हिलच्या चौका-चौकात लावण्यात आलेले गुजराती आणि जैन भाषेतील नामफलक अखेर महापालिकेनं तडकाफडकी हटवले आहेत. मनसेच्या इशाऱ्यानंतर पालिकेने ही मोठी कारवाई केली आहे. नेमका काय आहे हा संपूर्ण वाद? पाहूयात या ७ फोटोंच्या माध्यमातून...
मुंबईतील व्हीआयपी परिसर असलेल्या मलबार हिलमधील चौकात लावण्यात आलेले गुजराती आणि जैन भाषेतील नामफलक महापालिकेने तडकाफडकी काढून टाकले आहेत.
मलबार हिल परिसरातील चौका-चौकात केवळ गुजराती भाषेला प्राधान्य देणारे फलक लावण्यात आले होते. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र आक्षेप घेत पालिकेकडे अधिकृत तक्रार नोंदवली होती.
महाराष्ट्रात आणि मुंबईत असतानाही स्थानिक भाषेला डावलून गुजराती आणि जैन भाषेतील फलक का लावले? असा सवाल करत मनसेने हे नामफलक त्वरित हटवण्याची मागणी लावून धरली होती.
मनसेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत मुंबई महानगरपालिकेच्या ‘ए’ (A) विभाग कार्यालयाने तातडीने पथक पाठवले आणि चौकातील ते वादग्रस्त बोर्ड हटवण्यास सुरुवात केली.
मलबार हिल हा मुंबईतील अत्यंत उच्चभ्रू आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील परिसर मानला जातो. अशा भागात महापालिकेने केलेली ही धडक कारवाई सध्या मुंबईत चर्चेचा विषय ठरत आहे.
फलक हटवल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मुंबईत मराठी भाषेचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दमही यावेळी मनसेकडून देण्यात आला.
या कारवाईनंतर सोशल मीडियावर ‘मराठी पाऊल पडते पुढे’ म्हणत नेटकऱ्यांनी मनसे आणि पालिकेच्या तत्परतेचे स्वागत केले आहे. मुंबईतील भाषा वादावर या कारवाईने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.