धारावी : पुढारी वृत्तसेवा : हवेतील प्रदूषण रोखण्यात संबंधित प्रशासन अयशस्वी ठरले असून यावर तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, या मागणीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी आज (दि.३) सकाळी सायन येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर धडक मारली. यावेळी प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या संबंधितांवर प्रशासनाने कारवाई करून धूळ नियंत्रण आणि उपाययोजनांची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत मनसे पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजय भोसले यांना निवेदन दिले.
यावेळी मनसे रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना अध्यक्ष/संस्थापक योगेश परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे रस्ते, आस्थापना शिष्टमंडळ विजय जाधव – सरचिटणीस, योगेश जाधव – महाराष्ट्र सचिव, संतोष पार्टे – उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, बाबासाहेब अवघडे – उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, निलेश साळवी – ईशान्य मुंबई प्रशासकीय सचिव/सल्लागार, मंगेश पास्टे – एस विभाग प्रभाग संघटक, समीर राऊत – पी विभाग प्रभाग संघटक, दीपक जैन – एस विभाग उपप्रभाग संघटक आदी उपस्थित होते. मुंबई उपनगरातील विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप परिसरात विकासकामाला ऊत आला आहे. या विकासकामांमुळे हवेत बदल होऊन गुणवत्ता स्तर खालावला आहे. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडमुळे विक्रोळी विधानसभा क्षेत्रात कमालीची दुर्गंधी पसरली असून नाकतोंड बंद करून या जीवघेण्या दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
मागील काही दिवसापासून मुंबईचा एअर क्वॉलिटी इंडेक्स ३०० च्या वर जाणे, ही गंभीर बाब आहे. परिणामी नागरिकांना श्वसनाचे आजार, दमा, टीबी, खोकला सारख्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर अधिकाऱ्यांनी तत्काळ नियंत्रण करणाऱ्या अथॉरिटी वेगवेगळ्या आहेत. २० हजार चौ. मी परिसराच्या वर प्रदूषण असेल तर ती जबाबदारी आमची आहे. त्याखाली असल्यास ती जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. असे सांगितले. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी एअर क्वॉलिटी इंडेक्स बोर्ड प्रत्येक प्रभागात बसविण्याची मागणी केली असता याबाबत आम्ही संबंधित प्रशासनाची चर्चा करू, असे ते म्हणाले. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मनपा व संबंधित प्रशासनाची एकत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा