मुंबई : एमएमआरडीए भरती परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप फेटाळताना निकालाबाबतच्या तक्रारींचे निराकारण झाल्याचा दावा, एमएमआरडीएने केला होता; मात्र आता प्राप्त तक्रारींची स्वतंत्र उच्चस्तरीय पडताळणी करण्यासाठी समिती नेमली आहे. तसेच परीक्षा आयोजित करणाऱ्या टीसीएसकडून एमएमआरडीएने खुलासा मागवला आहे.
एमएमआरडीएने महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या नियम व प्रक्रियेनुसार २३५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या २६ हजार ७४९ उमेदवारांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी २० हजार ४५९ उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले.
या भरती प्रक्रियेचा प्राथमिक निकाल जाहीर झाल्यानंतर प्राधिकरणाकडे काही उमेदवारांकडून ई-मेलद्वारे तक्रारी व आक्षेप प्राप्त झाले आहेत. या तक्रारींचे निराकरण व्हावे आणि भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांच्या मनात कोणतीही शंका राहू नये, या उद्देशाने प्राप्त तक्रारींची पडताळणी स्वतंत्र उच्चस्तरीय ३ सदस्यीय समितीमार्फत करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. तसेच पुढील महिन्याभरात आणखी तक्रारी व आक्षेप स्वीकारले जाणार आहेत. त्यांची वस्तुनिष्ठ पद्धतीने पडताळणी केली जाईल.
या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि समितीला प्राप्त तक्रारींचे नि:पक्ष परीक्षण करता यावे, यासाठी समितीचे परीक्षण पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रियेतील पुढील कार्यवाही करण्यात येणार नाही. समितीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राधिकरणाकडून त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील योग्य निर्णय घेण्यात येणार आहे.
समितीत कोण ?
१.जॉनी जोसेफ, समिती अध्यक्ष - आयएएस अधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त, राज्याचे माजी मुख्य सचिव
२.प्रा. श्यामप्रसाद करगडे, समिती सदस्य - पीएच.डी., प्राध्यापक, आयआयटी मुंबई, जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी अध्यक्ष
३.दासका सत्यनारायण मूर्ती, समिती सदस्य - पीएच.डी., प्राध्यापक, आयआयटी मुंबई, जॅम आणि गेट परीक्षांसाठी उपाध्यक्ष
भरती प्रक्रियेसंदर्भात ज्या उमेदवारांना तक्रार, आक्षेप अथवा म्हणणे मांडायचे असेल त्यांना ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तक्रार vacancymmrda@mailmmrda.maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर सादर करता येईल.