मुंबई

मिठी होणार पूरमुक्त!

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  पावसाळ्यात मिठी नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाल्यास पूरस्थिती निर्माण होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने आता विहार तलावामधून ओव्हर फ्लो होणारे पाणी अडविण्याचा निर्णय घेतला आहे. हे अडवलेले पाणी भांडुप संकुल येथील जलशुद्धी प्रक्रिया केंद्रात जलवाहिनीद्वारे आणून त्यावर पुनर्रप्रक्रिया करून त्याचा वापर पिण्यासाठी करण्यात येणार आहे. अशी माहिती जल अभियंता खात्याचे प्रमुख अभियंते पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली.

मुंबई महापालिकेतर्फे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडक सागर तलाव, तानसा तलाव आणि पिसे- पांजरापूर येथील जल शुद्धीकरण प्रकल्प या ठिकाणी शनिवारी महापालिका विभागाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसोबत पाहणी दौरा पार पडला. त्यावेळी पुरुषोत्तम माळवदे यांनी पाणीसाठ्याबाबत, पाणी पुरवठा आणि जलशुद्धीकरण प्रक्रियेबाबत माहिती दिली. यावेळी, तानसा तलाव येथील कार्यकारी अभियंता श्रीधर चौधरी, उप अभियंता व्हावेकर, सहाय्यक सुरक्षा अधिकारी गोपीनाथ तेलवडे आदीं अधिकारी वर्ग उपस्थित होते.
विहार तलाव भरून वाहू लागल्यास ते पाणी मिठी नदीत जाते. यामुळे मिठी नदीला पूर येण्याची नेहमीच भीती असते. पूराचा फटका आजूबाजूच्या परिसरालाही बसतो. यामुळे मिठी नदी पूर मुक्त करण्यासाठी पावसाळ्यात विहार तलावातील ओसंडून वाहणारे पाणी भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रात वळवण्याच्या महापालिकेच्या योजनेला आता वेग आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT