मुंबई : पवन होन्याळकर
इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही विद्यार्थ्यांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचवण्यासाठी सुरू करण्यात आली होती. मात्र, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात हीच प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी मानसिक त्रास, पालकांसाठी धावपळ आणि शाळांसाठी प्रशासकीय डोकेदुखी पुजारी ठरली, अशी तीव्र टीका आता शिक्षण क्षेत्रातून होत आहे.कारण जुलैपर्यंत पूर्ण होणारी प्रवेश प्रक्रिया थेट डिसेंबर २०२५ पर्यंत रेंगाळली.
सन २००९-१० पासून मुंबई महानगर क्षेत्रात यशस्वी ठरलेली अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१७-१८ पासून टप्प्याटप्प्याने पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक आणि औरंगाबाद महापालिका क्षेत्रात राबवण्यात आली. २०२५-२६ पासून ती संपूर्ण राज्यभर लागू करण्याचा 'ऐतिहासिक' निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर झाला.
नोंदणीची रक्कम एजन्सीच्या घशात
अकरावी प्रवेशासाठी नोंदणी शुल्क घेतले जाते; पण मार्गदर्शन शून्य आहे. दरवर्षी नवे विद्यार्थी आणि पालक असताना मदत केंद्रे पुरेसे नाहीत. शालेय शिक्षण विभाग दर तीन वर्षांनी प्रवेश प्रक्रियेची एजन्सी बदलते. संकेतस्थळ बदलते, मात्र, अंमलबजावणी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र समोर आले.
लॉगिन पद्धत बदलते; पण विद्यार्थ्यांच्या अडचणी मात्र कायम राहतात. अशा परिस्थितीत नोंदणीसाठी घेतलेली रक्कम ही मार्गदर्शन, मदत केंद्रे, प्रशिक्षित कर्मचारी आणि तक्रार निवारणासाठी वापरली जाणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात मात्र ती रक्कम केवळ एजन्सीच्या घशात जाते का, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
डिसेंबरपर्यंत रेंगाळलेल्या प्रवेशाचे दुष्परिणाम असे...
शैक्षणिक वर्ष अर्ध्यावर असतानाही प्रवेश प्रलंबित
यू-डायस प्रणालीत विद्यार्थ्यांची नोंद करताना अडथळे
डिसेंबरमध्ये प्रवेशित विद्यार्थी संचमान्यतेत धरलेच नाहीत
शाळांच्या तुकड्या, शिक्षक संख्या आणि अनुदानावर परिणाम
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, मानसिक तणाव वाढला
२०२६-२७ साठी पालकांना हवेत असे बदल
प्रवेश प्रक्रिया मर्यादित कालावधीत पूर्ण करणे
नियम, अटी आणि कोटा धोरण पूर्वघोषित करणे
प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक आधीच जाहीर करणे
सर्व माध्यमिक शाळांना बंधनकारक मार्गदर्शन केंद्र घोषित करणे
कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य व लिपिक यांचे प्रशिक्षण
संकेतस्थळावरील माहिती समजेल अशा स्वरूपात प्रदर्शित करणे
विभाग स्तरावर विभागीय प्रवेश नियंत्रण समिती हवी
समितीमध्ये पूर्वानुभव व जाणकार व्यक्तींची निवड करणे