मुंबई : पावसात मिलन सबवे पश्चिम उपनगरातील नागरिकांसाठी सतत अडवणुकीचा मार्ग बनतो. अतिवृष्टी झाल्यास या सबवेमध्ये पाणी तुंबून वाहतूक ठप्प होते. दर वर्षी मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात हा सबवे तुंबणार नाही, असे महापालिकेची यंत्रणा छातीठोकपणे सांगू शकत नाही.
या पावसाळ्यात अवघ्या दहा दिवसांत सहा वेळा! २४ जून, २७ जून, ३० जून आणि १ जुलै, ३ जुलै आणि ४ जुलै! तोच सबवे. तेच गढूळ पाणी. त्याच 'बेस्ट' बसेस पाण्यात अडकलेल्या. तेच बॅरिकेड्स. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर झालेला वाहतूक कोंडीचा तोच खोळंबा आणि त्याच त्याच त्या बातम्या.
मिलन सब वे - अंधेरी सबवे हा अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या भागातील सर्वात सखल , सगळ्यात खोल भागांपैकी एक आहे. मुसळधार पाऊस पडल्यावर आजूबाजूच्या परिसरातील पाणी या सबवेच्या दिशेने वाहून येते. त्याच वेळी, जवळच असलेला मोगरा नाला आणि पावसाळी पाण्याचा निचरा करणारी ड्रेनेज यंत्रणा यांच्या क्षमतेवर मर्यादा येतात. त्यातच अतिक्रमण, गाळ, कचरा आणि पाण्याचा प्रचंड वेग यामुळे मिलन सब वे ला भरती येण्यासाठी कोणत्याही वेळापत्रकाची गरजच उरत नाही. समुद्राला भरती आल्यावर ही परिस्थिती अधिक गंभीर होते. समुद्राची पातळी वाढते, तेव्हा पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने होऊ शकत नाही. पाणी पंपाने उपसण्याच्या गतीपेक्षा जास्त वेगाने तिथे पाणी साचू लागते.
सबवेमध्ये पाणी उपसणारी पंपिंग यंत्रणा आणि ड्रेनेज इन्फ्रास्ट्रक्चर आहे; नाही असे नाही ! परंतु मुसळधार पावसात येणाऱ्या पाण्याचा उपसा करण्याची यंत्रणेची क्षमता संपते. आणि पंपिंग सुरू असूनही हा सबवे वारंवार पाण्याखाली जातो.