पुढारी ऑनलाईन डेस्क : वरळी हिट अँड रन प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समाेर येत आहेत. या प्रकरणातील आरोपी मिहिर शाहने अपघातानंतर आपल्या गर्लफ्रेंडला तब्बल ४० वेळा फोन केला होता. तसेच पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून तो महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रिसॉर्टमध्ये लपला होता. Mumbai BMW Hit and Run
मुंबईतील वरळीतील ॲट्रीया मॉलजवळ सोमवारी (दि.८) पहाटे दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्याला कारने पाठीमागुन धडक दिली. दुचाकीवरील महिलेला साधारणपणे तीन किलोमीटर फरपटत नेले. यात कावेरी नाखवा (वय ४५, वरळी कोळीवाडा) यांचा मृत्यू झाला हाेता. अपघातानंतर मिहिरने आपल्या मैत्रिणीला ४० वेळा फोन केला होता आणि पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून तो महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रिसॉर्टमध्ये लपला होता.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मिहिर शाहच्या मैत्रिणीने त्याची बहीण पूजा हिला फोन करुन माहिती दिली. त्यानंतर तिने आपल्या भावाला गोरेगाव येथून घेऊन बोरिवली येथील त्यांच्या राहत्या घरी गेली हाेती. घरी पोहोचल्यानंतर मिहीर शाह आणि त्याच्या कुटुंबातील तीन सदस्य, त्याचा मित्र अवदीपसह दोन कारमधून ठाण्यातील रिसॉर्टला गेले. काही तासांनी ते मुरबाड येथील दुसऱ्या रिसॉर्टमध्ये गेले. त्यानंतर सोमवारी (दि.८) संध्याकाळी मिहीर शहा आणि अवदीप हे विरार येथील रिसॉर्टला गेले, तर काही जण शहापूरला. अवदीपने १५ मिनिटे फोन ऑन केल्यावर सुमारे ७२ तासांच्या शोधानंतर मिहिर शाहला अखेर मंगळवारी (दि.९) अटक करण्यात आली हाेती.
आरोपी मिहिर शाह आणि कारचालक राजऋषी बिदावत हे मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. चौकशीदरम्यान दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींच्या उपस्थितीत प्रत्यक्ष अपघाताच्या रात्रीच्या समान क्रमाने एक दृश्य देखावा केला. सीजे हाऊस वरळी ते सी लिंक वरळी असा देखावा पुन्हा तयार करण्यात आला. आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली देताना सांगितले की, आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे. अटक केलेल्या मिहिर शहा याला बुधवारी (दि. १०) शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.
वरळी हिट अँड रन प्रकरणातील कार ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे उपनेते, पालघरमधील राजेश शाह यांची असून अपघातावेळी राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह कार चालवत होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेश शहा (Rajesh Shah) यांना जामीन मंजूर झाला आहे.
मिहिर शहाला ७२ तासांनंतर मंगळवारी अटक करण्यात आली. अपघातानंतर तो फरार झाला होता. मिहिर देश सोडून जाऊ नये, म्हणून पोलिसांनी लुकआउट नोटीसही जारी केली होती. दरम्यान अटकेनंतर पोलिसांना जबाब देताना अपघाता दरम्यान मी गाडी चालवत होताे, अशी कबुली मिहिर शहा याने दिली आहे. मिहिर शहा याला बुधवारी (दि. १०) शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरणात उत्पादन शुल्क विभागानेही कारवाई केली आहे. जुहूच्या व्हाईस ग्लोबल तापस बारला उत्पादन शुल्क विभागाने सील ठोकले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर बार सील करण्यात आल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितले. वरळी दुर्घटनेतील पहिला आरोपी मिहीर शहा याने त्याच्या चार मित्रांसोबत जुहू येथील व्हाईस गोलबल तापस बारमध्ये पार्टी केली होती.
पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, मिहिरला अपघातानंतर किती लोकांनी मदत केली. त्याला लपण्यासाठी कोणी मदत केली, हे शोधायचे आहे. त्याच्याकडे कार चालवण्याचा परवाना आहे की नाही, हे शोधून काढावे लागेल. गाडीची नंबरप्लेट कुठे आहे, अपघातानंतर आरोपींनी ती टाकून दिली होती काय ? याचीही माहिती घ्यावी लागेल, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.