मुंबई : नमिता धुरी
म्हाडाच्या बहुप्रतीक्षित मुंबई मंडळ सोडत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निघणार आहे. 2 हजार 500 घरांसाठी काढल्या जाणाऱ्या या सोडतीत मात्र अल्प उत्पन्न गटासाठी फक्त 91 घरे तर अत्यल्प गटासाठी एकही घर असणार नाही. त्यामुळे ही सोडत फक्त मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी असणार आहे.
म्हाडाने 2023 साली अत्यल्प उत्पन्न गटासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सोडत काढली. त्यानंतर 2024 साली मुंबई मंडळाने काढलेल्या सोडतीत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटाच्या घरांच्या किंमती प्रचंड होत्या. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना घरे घेता आली नाहीत. 2025 या वर्षात मुंबई मंडळाने सोडत काढली नाही. गेल्या काही सोडतींतील शिल्लक घरे सध्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेद्वारे विकली जात आहेत. यात घर मिळण्याची खात्री असली तरी मोठी अनामत रक्कम आणि कोट्यवधींच्या किंमती यांमुळे सर्वसामान्य ग्राहकांना घर घेण्यास फारसा वाव राहिलेला नाही.
यावर्षी 5 हजार घरांची सोडत काढली जाईल, अशी घोषणा म्हाडाने गेल्या वर्षीच केली होती; मात्र पत्राचाळीतील 2 हजार 500 घरांचे बांधकाम सुरू न झाल्याने ती घरे सोडतीतून वगळावी लागली आहेत. आता केवळ 2 हजार 500 घरांची सोडत पुढील महिन्यात काढली जाणार आहे; मात्र अत्यल्प गटासाठी फारशी घरे उपलब्ध नाहीत. अल्प गटातील घरांच्या किंमतीही कोट्यवधींमध्ये आहेत. त्यामुळे ही सोडत मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी असेल.