मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे सक्तीचे करण्यात आले असून, गुरुवारपासून (दि. २०) त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम एक महिन्याची नोटीस देण्यात येईल. या कालावधीत मराठीचे ज्ञान प्राप्त न केल्यास त्यांचा बॅज तीन महिन्यांपर्यंत निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी शिकण्यास नकार दिल्यास बॅज व परवाना रद्दची कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी (दि. १९) दिला.
राज्यात १९८९ पासून नियमाच्या आधारे रिक्षा व टॅक्सी चालविण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक आहे. १२ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार आता या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
रोजगार हिरावून घेण्याचा उद्देश नाही
महाराष्ट्रात देशाच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांना रोजगार मिळावा, ही शासनाची भूमिका आहे; मात्र महाराष्ट्राच्या भाषा आणि संस्कृतीचा अभिमान राखणेही आवश्यक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीचा प्रचार, प्रसार व संवर्धनाच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन बॅज देताना मराठी ज्ञानाची व्हिडीओ रेकॉर्डिंगद्वारे तपासणी
राज्यात आतापर्यंत ९ लाख ६५ हजार रिक्षा-टॅक्सी परवाने व बॅज दिले गेले आहेत. यापुढे नवीन परवाना व बॅज देताना चालकाला मराठीचे ज्ञान आहे की नाही, याची आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे तपासणी करतील आणि त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग होईल. मराठीचे व्यावहारिक ज्ञान असल्याचे स्पष्ट झाल्यावरच बॅज देण्यात येईल. या मोहिमेची जबाबदारी अतिरिक्त परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांच्याकडे सोपविली असून, पुढील महिन्याच्या शेवटी मोहिमेचा अहवाल सादर केला जाईल.