मुंबई: राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये अनेक वर्षांपासून हंगामी तत्त्वावर कार्यरत असलेल्या सुमारे १ हजार ८०० सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांच्या स्तरावर बैठका सुरू आहेत.
पोलीस ठाण्यांमध्ये हे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून अत्यल्प मानधनावर सेवा बजावत आहेत. त्यांची कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी प्रलंबित असून यासाठी गृह राज्यमंत्री योगेश कदम पाठपुरावा करत आहेत. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती गृह विभागातील अधिकाऱ्याने दिली.
गृह विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव अंतिम टप्प्यात नेल्याचे समजते. या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेतल्यास त्यांना नियमित वेतन, सेवा सुरक्षा तसेच इतर शासकीय लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
अनेक कर्मचाऱ्यांनी सरकारी नोकरभरतीची वयोमर्यादा ओलांडली आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.