मुंबई : राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचार्यांना वर्ग तीन व चारच्या खुल्या प्रवर्गातील पदावर विनाअट शासकीय नोकरी द्यावी, या मागणीसह आणि इतर मागण्यांसाठी अंशकालीन कर्मचार्यांनी आझाद मैदानात बुधवारपासून आंदोलन सुरु केले आहे. गेल्या 21 वर्षापासून सरकारने शासननिर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप यावेळी कर्मचार्यांनी केला.
संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा भारती साळवी व उपाध्यक्षा वैशाली राणे या नेतृत्व करीत आहेत. राज्यात 18, 644 पदवीधर अंशकालीन होते. त्यापैकी काही जण मयत झाले आहेत.21 वर्षापासून अंशकालीन यांना शासकीय सेवेत सामावून न घेतल्याने अनेकजण 50 वयाच्या पुढे गेले आहेत. तर काही जण 55 वर्षााच्या पुढे आहेत.त्यामुळे राज्य सरकारने आम्हाला विनाअट शासकीय सेवेत घ्यावे अशी मागणी केली.
भारती साळवी म्हणाल्या, सरकारने गतवर्षी अंशकालीन पदवीधर कर्मचार्यांना कायम सेवेत घेऊ, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. वर्ष झाले तरीही सरकारने या कर्मचार्यांना कायम सेवेत घेतलेले नाही. सरकारने निर्णय न घेतल्यास 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्रामदिवशी पदवीधर अंशकालीन कर्मचारी आत्मदहन करतील,असेही भारती साळवी यांनी सांगितले.
पदवीधर अंशकालीन कर्मचार्यांच्या मागण्या
1960 प्रमाणे हजेरी सहाय्यका प्रमाणे कायम नियुक्ती द्यावी.
समांतर आरक्षणामध्ये गुणाची अट शिथिल करावी.
ज्या कर्मचार्यांचे वय निघून गेले, त्यांना वेतन कायद्याप्रमाणे रक्कम उदरनिर्वाहासाठी द्यावी.
जे कर्मचारी हयात नाहीत, त्यांच्या पाल्यांना सवलत मिळावी.