मुंबई : राज्यात सागरी जलक्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत यांत्रिक आणि यंत्रचलित मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घातली आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार, या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) २०२१ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार, नौका मालक, तांडेल आणि खलाशी यांनी शासनाच्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. पावसाळी हंगामात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे मासेमारी करताना अपघात होण्याची शक्यता असते. या काळात माशांच्या प्रजनन कालावधी असल्याने मासेमारी बंदीमुळे मत्स्यसंपत्तीचे संवर्धन होण्यास मदत होते. त्यामुळे भविष्यात मच्छीमारांना अधिक मासळी उपलब्ध होऊन आर्थिक लाभ होणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाकडून म्हंटले आहे. या नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई शहर मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्तांनी केले आहे.