मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी नऊ जागांसाठी नऊच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपचे पाच, शिवसेना दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि उबाठा शिवसेनेचा प्रत्येकी उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.
या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे ही निवडणूक लढवणार असतील तर आम्ही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका भाजप, शिवसेना शिंदे गट व काँग्रेसने घेतली होती. मात्र ऐनवेळी ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली. मात्र उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसने दानवे यांना पाठिंबा दिला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून भाजपकडनही जादा उमेदवार देण्यात आला नाही. परिणामी ही निवडणूक बिनविरोध होत असून निकालाची औपचारिक घोषणा बाकी आहे.
भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांचे अर्ज दाखल करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी व शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. हे सर्वजण बिनविरोध निवडून आल्याचे आता जाहीर होईल.
प्रज्ञा सातवही बिनविरोध
प्रज्ञा सातव यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने या जागेसाठी भाजपने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधातही कुणाचा अर्ज न आल्याने त्याही बिनविरोध निवडून जाणार आहेत.