मुंबई : राज्यात पावणेदोन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करारांवर सह्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी हे करार करण्यात आले. श्याम स्टील आणि जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूहांकडून ही गुंतवणूक केली जाणार आहे. या संपूर्ण गुंतवणुकीमुळे राज्यात तीन हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.
राज्य सरकार महाराष्ट्रामध्ये उद्योग उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना पुरेपूर सहकार्य करीत आहे. त्यामुळे राज्यामध्ये सद्य:स्थितीत उद्योगांचे नवे पर्व सुरू झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पश्चिम बंगालमधील श्याम स्टील उद्योग समूह चंद्रपूर जिल्ह्यात गोडपिंपरीमध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक करून स्टील उद्योग उभारत आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दाखविलेल्या उद्योग समूहांना प्रत्यक्षपणे उद्योग सुरू करण्यास सुटसुटीत प्रक्रिया करण्यात आली आहे. बैठकीस उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी अनबलगन, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, श्याम स्टील उद्योग समूहाचे अध्यक्ष पुरुषोत्तम बेरीवाला, व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ बेरिवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी राणा, जेडब्ल्यू उद्योग समूहाचे अध्यक्ष जयदीप वानखेडे, व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्ती रेनेहान, संचालक संजय वाजे, अतुल गुप्ता, थॉमस पुर्दी आदी उपस्थित होते.