CM Devendra Fadnavis pudhari photo
मुंबई

Maharashtra heavy rain alert : राज्यात पुढील ४८ तास अतिवृष्टीचे; नाशिक-त्र्यंबकेश्वर पट्ट्यात ढगफुटीचा इशारा

हवामान विभागाने ८ जुलैपर्यंत राज्यातील काही भागांना 'रेड' आणि 'ऑरेंज अलर्ट' दिला असून, मुंबई, ठाणे, पालघर, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईसह राज्याच्या विविध भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना अतिवृष्टीमुळे पुराचा वेढा पडला असून, राज्यासाठी पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. हवामान विभागाने ८ जुलैपर्यंत राज्यातील काही भागांना 'रेड' आणि 'ऑरेंज अलर्ट' दिला असून, मुंबई, ठाणे, पालघर, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे.

तसेच, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मंगळवारी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या मध्यवर्ती भागात तब्बल ३०० मिमी पावसासह 'ढगफुटी' होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा 'अलर्ट मोड'वर असून अत्यावश्यक असल्याशिवाय दोन दिवस नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. त्यानंतर राज्यातील पूरपरिस्थितीचा आणि प्रशासकीय उपाययोजनांचा विस्तृत आढावा घेत प्रशासनाला सूचना केल्या. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

पालघरला सर्वाधिक फटका

गेल्या ४-५ दिवसांत पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका बसला आहे. वसई-विरारसह सखल भागात प्रचंड पाणी साचले असून तिथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. अहमदाबाद-मुंबई या नवीन मार्गाच्या कामामुळे पाणी साचल्याने गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या सेवा ठप्प झाल्या आहेत. पालघरमध्येही सायंकाळी भरतीची वेळ असल्याने रात्री पूरपरिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती आहे.

पश्चिम महाराष्ट्रात धोक्यांची घंटा

दरम्यान, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांनी रौद्ररूप धारण केले असून सावित्रीसह चार प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. सुदैवाने सावित्री नदीचे पाणी अद्याप महाड शहरात शिरलेले नाही, तिथे प्रशासन खडा पहारा देत आहे. कोल्हापुरातही नद्यांनी पातळी ओलांडल्याने धोक्याची घंटा वाजली आहे.

ज्यांनी सत्तानाश केला, ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत

ज्यांना काही समजत त्यांना उत्तर दिले पाहिजे. ज्यांनी जीवनात काही केले नाही, एक पूलही बांधला नाही, ज्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचा सत्तानाश केला, ते आता आम्हाला प्रश्न विचारत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेचा समाचार घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT