मुंबई: राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या हद्दीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालये व्यवस्था उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या सुविधेसाठी तब्बल १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, सर्व महानगरपालिकांकडून शौचालय उभारणीसंदर्भातील प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ही माहिती दिली.
सध्या अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या वापराबाबत तृतीयपंथीयांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात स्वतंत्र आणि सुलभ शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन शौचालये उभारण्यासाठी स्वतंत्र जागेचा मोठ्या प्रमाणावर शोध घेण्याऐवजी, सध्या कार्यरत असलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या शेजारी अथवा लागूनच ही सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून कामाला वेग देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
टप्प्याटप्प्याने उभारणार
राज्यातील सर्व महानगरपालिकांना तृतीयपंथीयांसाठी शौचालयांची आवश्यकता, उपलब्ध जागा आणि प्रस्तावित ठिकाणांची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले आहे. प्राप्त प्रस्तावांच्या आधारे निधीचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने शौचालयांची उभारणी केली जाणार आहे. तृतीयपंथीय समुदायाला सार्वजनिक ठिकाणी सन्मानाने आणि सुरक्षितपणे मूलभूत सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे मिसाळ यांनी स्पष्ट केले.