मुंबई ः इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी फेटाळून लावला. राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही. माध्यमांनी काही शहरांत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त दिले. त्यामुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण मोठ्या रांगा लागल्या. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार भविष्यातील स्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे, असे त्यांनीही स्पष्ट केले.
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक पातळीवर परिणाम होत असून त्याचा फटका भारतालाही बसत आहे. सध्या देशात एलपीजी गॅसची तुटवड्याची परिस्थिती जाणवत असून, याचा सर्वात मोठा परिणाम हॉटेल उद्योगावर झाला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसचे दर अचानक वाढले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय पुढे कसा चालवायचा,हा प्रश्न व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. दुसरीकडे, घरगुती गॅसच्या दरातही 60 रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घराचे गणित बिघडले आहे. यासंदर्भात रविवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात कुठेही इंधनाची टंचाई नाही.
परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमचे सरकार सक्षम ः मुख्यमंत्री
काही माध्यमांनी पेट्रोल - डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या बातम्या दिल्या. यामुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण मोठमोठ्या रांगा लागल्या. असा कोणताही तुटवडा निर्माण झालेला नाही. केंद्र सरकारनेदेखील याबद्दल वारंवार खुलासा करून वस्तुस्थिती समोरआणली आहे. भविष्यात जी परिस्थिती निर्माण होईल, तिचा सामना करण्यासाठी सरकार पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सक्षमपणे भक्कम परिस्थितीत आहे, असे त्यांनी सांगितले.