नवी दिल्ली : घरगुती वीज ग्राहकांना पुढील पाच वर्षांत तब्बल २६ टक्क्यांनी तर उद्योग क्षेत्राला दरवर्षी २ - ३ टक्क्यांनी वीजदरात दिलासा मिळणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. २०२५ ते २०३० या कालावधीसाठी राज्यात मल्टी इयर टॅरिफ मंजूर झाला असून, तो लागूही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यापूर्वी राज्यात दरवर्षी सुमारे ९ टक्क्यांनी विजेचे दर वाढत होते. मात्र आता नव्या धोरणामुळे उद्योग क्षेत्रासाठी वीजदरात दरवर्षी घट होणार असून, त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना मोठा दिलासा मिळेल. त्याचबरोबर घरगुती ग्राहकांनाही पुढील पाच वर्षांत २६ टक्क्यांपर्यंत दरकपातीचा फायदा मिळणार आहे. घरगुती ग्राहकांसाठी होणारी दरकपात ही सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा मानली जात असून, महागाईच्या पार्श्वभूमीवर वीज बिलाचा ताण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.