Maharashtra assembly session
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवन पायऱ्यांवर विरोधकांच आंदोलन file photo
मुंबई

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून, १४ व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन केले.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी सरकारने दिलेले चहापानाचे निमंत्रण विरोधकांनी नाकारून सरकारविरोधात अधिवेशन सुरू होण्याआधीच शड्डू ठोकला होता. पहिल्याच दिवसापासून विधिमंडळाच्या पायर्‍या आणि दोन्ही सभागृहांत विरोधकांची आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद या अधिवेशनात जाणवत आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात येताच त्यांच्यासमोर विरोधकांनी आक्रमक घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची वीजबिल माफ करावी, कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाचा बळी, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.

14 व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन

आजपासून सुरू होणार्‍या अधिवेशनाचा समारोप १२ जुलैला होणार आहे. तीन आठवडे चालणारे हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. १४ व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न विरोधकांतर्फे केले जाणार असून, शेवटच्या अधिवेशनात विविध घोषणा, अर्थसंकल्प यांच्या माध्यमातून मतदारांना पुन्हा एकदा संधी देण्याची साद महायुती सरकार घालणार आहे.

SCROLL FOR NEXT