मुंबई : राज्यात 2024-25 मध्ये एकूण ऊर्जा निर्मितीच्या तब्बल 30 टक्के वीजचोरी झाली असल्याची बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून उघड झाली आहे. त्यामध्ये महापारेषण आणि महावितरणची हानी अनुक्रमे 15.1 टक्के व 15.2 टक्केचा समावेश आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत वर्षभरात तीन लाखांनी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गुरुवारी हा अहवाल मांडण्यात आला. 31 मार्च 2025 रोजी राज्यात वीज निर्मितीची एकूण व्यापित क्षमता 41.019 मेगावॅट असून त्यापैकी औष्णिक ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा, जलजन्य ऊर्जा नाणि नैसर्गिक वायुजन्य ऊर्जेचा हिस्सा अनुक्रमे 51.3 टक्के, 34.4 टक्के, 7.5 टक्के आणि 6.8 टक्के होता.
2024-25 मध्ये राज्यात एकूण 1,40,171 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली. याशिवाय केंद्रीय क्षेत्राकडून 85.009 दशलक्ष युनिट वीज उपलब्ध झाली असून राज्यातील एकूण विजेचा वापर 1,66,224 दशलक्ष युनिट होता.
2024-25 मध्ये राज्यात विजेची सरासरी कमाल मागणी 23.374 मेगावॅट होती, तर त्यावेळी विजेचा पुरवठा 24.335 मेगावॅट होता. राज्य नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेनुसार राजस्थान आणि गुजरातनंतर देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
राज्यात वर्षभरात 2 लाख 82 हजार 282 इलेक्ट्रिक वाहनांची भर पडली आहे. डिसेंबर 2024 मध्ये ही संख्या 6 लाख 44 हजार 779 होती. तर डिसेंबर 2025 मध्ये ती 9 लाख 27 हजार 061 पर्यंत पोहचली.
राज्यात मार्च 2025 अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदांच्या देखभालीखालील रस्त्यांची लांबी सुमारे 3.45 लाख किमी होती. 1 जानेवारी 2026 रोजी रस्त्यावरील वाहनांची संख्या राज्यात 528 लाख (153 वाहने प्रति किमी रस्ता लांबी) होती, तर 1 जानेवारी 2025 रोजी 488 लाख (149 वाहने प्रति किमी रस्ता लांबी) होती.