मुंबई : चर्चगेट येथील मुंबई विद्यापीठाच्या मादाम कामा मुलींच्या वसतिगृहातील ११० हून अधिक विद्यार्थिनींच्या अडचणीचा प्रश्न तसेच गेल्या दोन आठवड्यांपासून पाण्यासाठी सुरू असलेली धावपळ अखेर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दारी पोहोचली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी बाहेरून बाटल्या आणण्यापासून ते विद्यापीठाच्या अन्य इमारतींमधून पाणी आणण्याची वेळ विद्यार्थिनींवर आली होती. या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेच्या जल विभागातील अभियंते, उच्च शिक्षण विभाग आणि मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. पाण्याच्या प्रश्नावर केवळ टँकरचा तात्पुरता पर्याय न करता त्यामागील तांत्रिक अडचण दूर करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
वसतिगृहात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत आहे. गेल्या काही दिवसांपासून टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने पिण्याच्या पाण्यापासून दैनंदिन वापरापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
पालिकेच्या सहायक अभियंता अंकिता झोडापे यांनी बैठकीत कमी दाबाने पाणी येण्यामागील तांत्रिक कारणांची माहिती दिली. त्यानंतर आवश्यक तांत्रिक उपाययोजना तातडीने करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे टँकरवर अवलंबून असलेल्या विद्यार्थिनींना लवकरच नियमित पाणीपुरवठा मिळणार आहे.
व्यवस्थापन समिती पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय
वसतिगृहातील सर्व खिडक्यांना मजबूत सुरक्षाजाळ्या बसविणे, बाह्य परिसरात अतिरिक्त क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि अग्निसुरक्षा यंत्रणेची प्रत्यक्ष तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थिनी आणि कर्मचाऱ्यांसाठी नियमित अग्निसुरक्षा सराव घेण्याचेही ठरविण्यात आले. विद्यार्थिनींच्या दैनंदिन अडचणी आणि सुरक्षेच्या दृष्टीने वसतिगृहात पूर्णवेळ अधीक्षक उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रशासन आणि विद्यार्थिनी यांच्यातील संवाद सुरळीत राहण्यासाठी वसतिगृह व्यवस्थापन समिती पुन्हा सक्रिय करण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या शीतल देवरुखकर-शेठ, पालिकेच्या सहायक अभियंता अंकिता झोडापे यांच्यासह संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न
काही दिवसांपूर्वी आमदार चित्रा वाघ यांनी वसतिगृहाची प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांसह त्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. पाणीपुरवठ्याबरोबरच वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्नही त्यांनी मांडला. त्याची दखल घेत बैठकीत पाणीपुरवठ्यासोबतच सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही निर्णय घेण्यात आले.