मुंबई : राज्यभरात दहा अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्क उभारले जाणार असून, यासंदर्भातील सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आल्या. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरसह पनवेल, भिवंडी, नागपूर, चाकण यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी हे लॉजिस्टिक्स पार्क विकसित केले जाणार आहेत. या क्षेत्रात 5 हजार 127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक केली जाणार असून, त्यातून 27 हजार 510 रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृहात राज्य सरकार आणि ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स व होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात हा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार राज्यातील प्रमुख औद्योगिक आणि मल्टिमोडल लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये आधुनिक लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रियल पार्क्सचा विकास केला जाणार आहे.
या करारानुसार, महाराष्ट्रात 10 हून अधिक आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पार्क उभारले जाणार आहेत. यासाठी 794.2 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार असून, यापैकी 1 कोटी 85 लाख चौरस फूट जमिनीवर बांधकाम करण्यात येईल. या सामंजस्य करारातून नागपूर, मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी जागतिक दर्जाचे, पर्यावरण, सामाजिक आणि शासकीय अनुकूल असे औद्योगिक, तसेच लॉजिस्टिक्स हब तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले आहे. भारतातील उत्पादन, वेअरहाऊसिंग आणि पुरवठा साखळी उत्कृष्टतेसाठी एक सशक्त पायाभूत रचना निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर. के. नारायणन यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, ब्लॅकस्टोन अॅडहायझर्स प्रा. लि.चे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक तुहिन पारिख, ब्लॅकस्टोन अॅडव्हायझर्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक आलोक जैन, एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्सचे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल उपस्थित होते.