मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ अजित पवार यांना राजकीयदृष्ट्या संपविण्यासाठी पक्षात षड्यंत्र सुरू आहे, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठवले आहे.
या पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि पार्थ पवार यांच्या भवितव्याबाबत राजकीय चर्चांना तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. आहेर यांचे हे तीन पानी पत्र आहे. पार्थ पवार यांची राजकीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच त्यांचा राजकीय उदय रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. यामागे ‘अनाजीपंत’ वृत्तीचे काही लोक सक्रिय आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.
पार्थ पवार हे सक्षम आहेत; पण त्यांच्याविरोधात पक्षातच गैरसमज पसरविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. त्यांच्याकडे राजकीय परिपक्वता नाही. ते जनतेला न्याय देऊ शकणार नाहीत, असा अपप्रचार करून काहीजण त्यांची प्रतिमा मलीन करत आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पार्थ पवार यांचे ‘मोरल डाऊन’ करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक झाले. अजित पवार यांनाही पार्थ पवार यांना मोठी जबाबदारी देण्याची इच्छा होती, असा दावाही आहेर यांनी पत्रात केला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्री करण्यासाठी आग्रह धरावा.
केंद्रीय मंत्रिपद ही केवळ पार्थ पवार यांच्यासाठी संधी नसून, त्यांच्याविरोधात आरोप आणि गैरसमज पसरविणाऱ्यांना राजकीय उत्तर देण्याची संधी ठरेल, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे.
प्रफुल्ल पटेल नाराज?
निवडणूक आयोगाला कार्याध्यक्षपदाबाबत दुरुस्त पत्र पाठविण्यास पक्षाकडून दुर्लक्ष आणि पार्थ पवार यांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी फोडलेल्या लेटर बॉम्बमुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल नाराज असल्याची चर्चा आहे.
पक्षाच्या संघटनात्मक फेरबदलांमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती. मात्र, नियुक्तीबाबत कोणतीही अधिकृत कार्यवाही झाली नाही. यामुळे पटेल यांच्या नाराजीमध्ये भर पडत असल्याचे बोलले जात आहे.