मुंबई : ई-केवायसी प्रक्रियेमुळे थकलेला तीन महिन्यांचा 4500 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र दिला जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातून देण्यात आली आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेने राज्यातील महिलांना थेट आर्थिक आधार दिला आहे. या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये मदत दिली जात असून या योजनेचा थेट राजकीय फायदा महायुती सरकारला झाला आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
दरम्यान, ई-केवायसी न झाल्याने अनेक महिलांचे हप्ते थांबले. काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही पैसे जमा न झाल्याने नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी महिला थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करतानाही दिसल्या. या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने संबंधित महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच नियम आणि अटी डावलून करण्यात आलेल्या अर्जांची सध्या पडताळणी सुरू आहे. अशा परिस्थितीत आता लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक आणि आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 4500 रुपये जमा होणार आहेत. काही महिलांना आधीच दोन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. ज्यांचे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांचे हप्ते थकले होते, त्यांना आता 4500 रुपये मिळणार, तर ज्यांना दोन हप्ते मिळाले त्यांना मात्र जानेवारीचा एकच हप्ता मिळणार आहे.
2100 रुपये होणार?
भविष्यात लाडकी बहीण योजनेचा मासिक हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात स्पष्ट संकेत दिले आहेत. हा निर्णय झाल्यास राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.