मुंबई : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. ती आता १५ ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
राज्यातील ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ करण्यात आली आहे. पुढील चार दिवसांत अर्ज करून या योजनेचा लाभ महिलांना घेता येईल. मात्र १५ ऑक्टोबरपर्यंत भरावयाचे अर्ज हे केवळ अंगणवाडी सेविकांमार्फतच भरावे लागणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या मुदतवाढीबाबत शासनाकडून सूचना प्राप्त झाली आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. राज्यात आतापर्यंत २ कोटी ३० लाख महिलांच्या खात्यात ५ महिन्यांचे हप्ते सरकारकडून जमा करण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी दिलेली ही तिसरी मुदतवाढ आहे.