भांडुप रेल्वे स्थानकात कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना थांबा देण्याच्या हालचालींनी वेग आला आहे file photo
मुंबई

Bhandup Railway Station : भांडुप स्थानकात कोकण रेल्वेला थांबा ?

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकात कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना थांबा देण्याच्या हालचालींनी वेग आला आहे. त्यासाठी स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ४१ कोटींची तरतूद केली आहे.

यामुळे मुंलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळ, घाटकोपर भागातील चाकरमान्यांचा मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु भांडूप स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आली नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.

मुंबईच्या लोकसंख्येच्या सुमारे २५ टक्के चाकरमानी आहेत. पूर्व- पश्चिम उपनगरांत मोठ्या संख्येने कोकणातील चाकरमानी राहतात. दरवर्षी शिमगा, उन्हाळी सुट्टी आणि गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या प्रचंड असते. परंतु कोकणात जाणाऱ्या सर्व मेल-एक्सप्रेस गाड्या सीएसएमटी, दादर आणि एलटीटी स्थानकातून सुटतात. सीएसएमटी स्थानकातून सुटलेल्या गाड्या दादर आणि ठाणे स्थानकात थांबतात. एलटीटीहून निघालेल्या गाड्या पनवेल स्थानकात थांबतात. त्यामुळे पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर येथे राहणाऱ्या चाकरमान्यांना दादर, एलटीटी, ठाणे स्थानकातून गाड्या पकडाव्या लागतात. गावी जाताना आणि येताना हीच परिस्थिती असल्याने चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

कुटुंबातील महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सामानासह दादर, ठाणे, पनवेल स्थानक गाठावे लागते. त्यासाठी लोकल किंवा खासगी चारचाकीने प्रवास करावा लागतो. लोकलला प्रचंड गर्दी असल्याने चाकरमान्यांचे हाल होतात. तर रस्ते मार्गे चारचाकीने जाण्यासाठी बरेच पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून भांडूप स्थानकात कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना थांबा देण्याची मागणी होत होती. प्लॅटफॉर्मची लांबी वाढल्यावर कोकण कन्या व तुतारी या गाड्यांना भांडूप स्थानकात थांबा देण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, भांडूप रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याबाबत आणि त्यासाठी निधी मंजूर केल्याबाबत कोणतीही सूचना रेल्वे बोर्डाकडून आली नसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले.

६ लाख चाकरमान्यांना मिळणार दिलासा

भांडुप, कांजूर, विक्रोळी या भागातील सुमारे ७ लाख ७२ हजार लोकसंख्येपैकी सुमारे तीन ते साडेतीन लाख कोकणी लोकवस्ती आहे. घाटकोपर विभागातील सुमारे ६ लाख ४६ हजार लोकसंख्येपैकी सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त कोकणी पट्टा आहे. यात असल्फापासून भटवाडी व अन्य पश्चिमेकडील भागाचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT