पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात या पद्धतीचं राजकारण आधी नव्हतं. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडाबाजार झाला. पराभव हा पराभव असतो, मी आत्मचिंतन करत आहे. जनतेनेही विचार करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांनी दिली आहे. विधान परिषद निवडणूक निकालानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
आजपर्यंत मी ज्या निवडणुका लढविल्या त्यामध्ये अशी परिस्थिती नव्हती. जनतेने आणि मतदारांना आता विचार करण्याची गरज आहे. मी राष्ट्रवादीच्या बारा मतांवर उभा होतो. त्यात एक मत फुटलं, आमची मतही फुटली. जर अजून चार मतं मिळाली असती तर २५ ते ३० मते घेवून मी जिंकलो असतो. तेच गणित होतं. काँग्रेसने दुसऱ्या पसंतीची मते समान वाटली असती तरी निकाल बरोबर होता. मी १४ मते घेऊनच निवडणूक लढवत होतो. मी निकालावर आत्मचिंतन करत आहे, असे जयंत पाटील म्हणाले. यापुढेही महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.