मुंबई : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे विशेषत:इराण मधून भारतात आयात होणारा पिस्ता काजू व ममरा बदाम यांच्या दरात वाढ झाली असून, पिस्ताच्या दरात प्रतिकिलो 200 रुपये तर ममरा बदाम यांच्यात 400 रुपयांनी वाढ झाली आहे.
रमजान महिना सुरु होण्यापुर्वी आखाती देशामधून सुकामेव्याची आवक मोठ्या प्रमाणात बाजारात आल्याने मुबलक प्रमाणात साठा आहे. त्यामुळे पिस्ता व ममरा बदाम दरवाढ वगळता अन्य सुकामेव्याच्या दर स्थिर असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. आखाती देशात युद्ध सुरु होऊन महिना झाला आहे. इराणमधून भारतात पिस्ता,ममरा बदाम याची आयात होते.तेथून सध्या आवक कमी झाल्याने त्याचा दरावर परिणाम झाला.
मुंबईतील बाजारपेठेत सध्या इराणमधील पिस्ता 2400 रुपयांवरुन 2600 रुपये प्रतिकिलो तर ममरा बदाम 2800 रुपयांवरुन 3200 रुपयांवर पोहोचला आहे. सौदी अरेबियातून सर्वप्रकारचे खजूर,अंजीर व मनुके मुंबईत येतात. खजूर 400 रुपये किलोपासून ते 1600 रुपयांपर्यंत आणि अंजिर 1200 पासून ते 3200 रुपयांपर्यंत आहे. त्यांचा दर स्थिर आहे. परंतु; काळे मनुकेच्या दरात प्रतिकिलो 200 रुपयांनी वाढ झाल्याने तो 1200 रुपयांपर्यत पोहोचला आहे.तुर्की मधून ॲप्रिकॉट (जर्दाळू) याच्यात 200 रुपयांनी वाढ होऊन तो 1400 रुपये इतका झाला आहे.पुर्वी तो 1200 रुपये होता.
क्रॉफर्ड मार्केट येथील विक्रेते हौशीराम म्हस्के म्हणाले, युद्ध सुरु होण्यापुर्वी साधारणत: 15 फेब्रुवारी दरम्यान सुकामेव्याची आवक मोठ्या प्रमाणात आली आहे.त्यामुळे बाजारपेठेत सुकामेव्याचा तुटवडा नाही.फक्त;इराणमधील पिस्ता व ममरा बदामची आवक कमी झाल्याने त्याच्या दरात वाढ झाली आहे. सध्या इराणचे उत्पादन वगळता अन्य सुकामेवा याचे दर स्थिर आहेत.
दृष्टिक्षेपात सुकामेवा दर (किलो)
ग्रीन मनुके : 1200 रुपये
अंजीर : 1200रुपयांपासून ते 3200 रुपयांपर्यत
कॅलिफोर्निया बदाम : 1 हजार रुपयांपासून ते 1400 रुपयांपर्यत
काजू : 800 रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंत