Farokh Engineer Pudhari
मुंबई

Farokh Engineer: ५३ वर्षांपूर्वी घोषणा; पण अजून मिळेना ‘पद्मश्री’! निवृत्त क्रिकेटपटू फारूख इंजिनिअर यांचे पाणावले डोळे

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्‍या मुलाखतीत इंजिनिअर यांनी सांगितले की, ‘१९७३ मध्ये वृत्तपत्रांच्या माध्यमातून भारत सरकारने त्यांची देशाच्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी (पद्मश्री) निवड केल्‍याचे समजले होते.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: क्रिकेटच्‍या मैदानात भल्‍याभल्‍या दिग्‍गजांचे झेल यष्‍टीमागे टिपणारे भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू आणि उत्कृष्ट यष्टिरक्षक फारूख इंजिनिअर यांचे ग्‍लोव्‍हज्‌ ‘पद्मश्री’ पुरस्कार स्‍वीकारण्‍याच्‍या बाबतीत मात्र रितेच राहिले आहेत.

इंजिनिअर यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर होऊन ५३ वर्षांहून अधिक काळ लोटला असला, तरी अद्याप त्यांना या सन्मानाशी संबंधित अधिकृत दस्तऐवज किंवा माहिती मिळालेली नाही, अशी धक्‍कादायक माहिती स्‍वत: इंजिनिअर यांनीच दिली आहे.

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्‍या मुलाखतीत इंजिनिअर यांनी सांगितले की, ‘१९७३ मध्ये वृत्तपत्रांच्या माध्यमातून भारत सरकारने त्यांची देशाच्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी (पद्मश्री) निवड केल्‍याचे समजले होते.

त्यावेळी ते इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळत होते. भारतीय संघाचे व्यवस्थापक हेमू अधिकारी यांनीही त्यांना याबाबत माहिती दिली होती. परंतु, मला आजवर याबाबत अधिकृत सूचना किंवा माहिती मिळाली नाही. मी तेव्हापासूनच माझ्या पुरस्काराची वाट पाहत आहे.’

‘पद्म’च्या वेबसाईटवर नाव

‘पद्म’ पुरस्कारांच्या अधिकृत संकेतस्थळावर १९७३ च्या पुरस्कार विजेत्यांच्या यादीत फारूख इंजिनिअर यांचे नाव आहे. प्रत्‍यक्षात आजवर त्‍यांना हा सन्मान मिळालेला नाही. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लवकरच सरकारला पत्र लिहून इंजिनिअर प्रकरणाची माहिती देईल, असे सूत्रांचे म्‍हणणे आहे.

‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड’ संघाचे मुख्य यष्टिरक्षक

इंजिनिअर १९६१ ते १९७५ दरम्यान भारतासाठी ४६ कसोटी सामने खेळले. १९७० च्या दशकात सुरुवातीला इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणाऱ्या ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड’ संघाचे ते पहिल्या पसंतीचे यष्टिरक्षक होते.

८८ व्या वर्षीही प्रतीक्षा कायम

इंजिनिअर आता ८८ वर्षांचे आहेत. त्‍यांच्यासाठी हा सन्मान केवळ पुरस्कार नव्‍हे, तर देशासमवेतच्‍या नात्याचे प्रतीक आहे.

ते म्हणाले, ‘मी इंग्लंडमध्ये राहतो; पण मनापासून भारतीय आहे. हा पुरस्कार मला तो फ्रेम करून ठेवायला आवडेल. राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले गेल्यास आनंद होईल. पत्नीसोबत जाऊन हा सन्मान स्वीकारण्‍याची इच्छा आहे.’

त्या काळात वृत्तपत्रे हेच माहितीचे सर्वात मोठे माध्यम होते. हेमू अधिकारी म्‍हणाले होते की, सरकारकडून अधिकृत माहिती मिळेल. परंतु, तसे घडलेच नाही. कुणाशी संपर्क साधावा, हेही माहीत नव्हते. सरकारकडून संपर्काची मी वाट पाहत राहिलो. अरुण जेटली यांच्या निधनापूर्वी कल्‍पना दिली होती. आता जय शहा यांनाही लिहिले आहे. त्‍यांनी मदतीचे आश्‍वासन दिले आहे.
- फारूख इंजिनिअर निवृत्त यष्‍टिरक्षक, भारतीय क्रिकेट संघ
SCROLL FOR NEXT